पुण्यातील वेताळ टेकडी प्रकल्पावर देखील बोलले ठाकरे ….
मुंबई-शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोळ सुरू आहे. मुंबईतील रस्त्याची कंत्राटे केवळ 5 कंपन्यांना दिली. एकीकडे भ्रष्ट प्रशासन आणि सरकार मलिदा खात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी शिंदे सरकारने जानेवारीत घाईघाईत वर्क ऑर्डर काढली. पालिकेत नगरसेवक नसताना मोठी कंत्राटे दिली गेली. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. ही कामे कधी सुरू होणार?, कुठे सुरू होणार?, याची माहिती मुंबई पालिकेला मिळणे अतिशय महत्त्वाची आहे.
आदित्य टाकरे म्हणाले, मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेने जवळपास 650 कोटींचे टेंडर दिले आहे. अजूनही कामे सुरूच नाहीत. सर्वसामान्यांचे पैसे अशा पद्धतीने बिल्डरांच्या घशात टाकले जात आहे. कामातील दिरंगाईबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे माजी नगरसेवक बंधू यांनीही नाराजी केली आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे. मुंबईतील सर्व वॉर्डांमधील कामे ठप्प आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाराज आहेत. गद्दार गँग सोडली तर सर्वपक्षीयांमध्ये याबाबत नाराजी आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे. सीएम हे ‘करप्ट मॅन’ आहे. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर 50 टक्क्यांहून जास्त वाढले असून परिणामी रस्ते पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, जानेवारीत वर्क ऑर्डर देऊनही मुंबईतील कामे ठप्प आहेत. डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता 31 मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. नवीन रस्त्यांच्या कामाच्या डेडलाईनबाबत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

