मुंबई- काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींचा असा कोणताही प्रोग्राम नाही असे म्हणत या भेटीबाबतची शक्यता तूर्तास तरी नसल्याचे सांगितले आहे . मात्र राहुल गांधी भाजपविरुद्ध विरोधकांची मोट बांधत असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले.सावरकरांच्या मुद्दयावरुन महाविकास आघाडीतील धूसफुस चव्हाट्यावर आली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर काँग्रेसकडूनही नाराजीचे सूर उमटल्याचे बोलण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु करण्यात आल्या आहेत पण तसे काही होणार नाही असे पटोले यांनी म्हटले आहे.
नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षाची आघाडी मजबूत असून आम्ही भाजपविरोधात एकत्रितपणे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीबाबत अजून काहीही ठरलेले नाही. पर्वा नितीश कुमार, तेजस्वी यादव राहुल गांधींना भेटले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली. काल राहुल गांधी आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांची देखील भेट झाली. मात्र राहुल गांधी हे मुंबईत येणार असल्याचा कोणताही प्रोग्राम सध्या तरी नाही.

