मुंबई :
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात दिसून येत आहे. रात्री 12 वाजेपासून फटाक्यांच्या आतषबाजीने जयंतीला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे.
राज्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आज सायंकाळी मिरवणुका निघणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काल रात्री दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुंबईसह राज्यात सर्वत्र साजरी होणार आहे. यानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच इंदू मिल येथे साकारण्यात येणाऱ्या स्मारकाचा कामाला गती देण्याचे निर्देशही दिले आहेत. जागतिक दर्जाचे स्मारक तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

