पुणे 13 – मोदी सरकारने लोकशाहीचे सर्व संकेत धुडकावून बेदरकारपणे राज्यकारभार सुरू केला आहे. त्यातून सामान्य माणसाचे सगळेच हक्क हिरावले गेले आहेत. त्याविषयी आवाज उठवण्याचा अधिकारही त्यांच्यात राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता देशाच्या लोकशाहीवर आलेल्या या संकटाचा धोका सर्वसामान्य माणसांनी ओळखून त्या अनुरूप आता आपली भूमिका ठरवली पाहिजे असे प्रतिपादन आज लोकशाहीचे भवितव्य या विषयावर स्व यशवंतराव चव्हाण विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थित वक्त्यांनी केले.वसंतराव बागुल उद्यानामध्ये माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या चर्चासत्रात ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास दादा पवार, संजय बालगुडे, पत्रकार हरीश केंची, आणि पत्रकार अविनाश गोडबोले हे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना उल्हास पवार म्हणाले की लोकशाही नष्ट होणे याचा अर्थ सामान्य माणसाचा जगण्याचा अधिकार नाहीसा होणे असा आहे आज गॅस पेट्रोल सह सर्व जीवनावश्यक वस्तूंची महागाई इतकी प्रचंड वाढलेली असताना त्यावर आपल्याला आवाजही उठवण्याचा अधिकार उरत नसेल तर या लोकशाहीला काहीही अर्थ नाही त्यामुळे या संबंधात सर्वांनी जागरूकपणे आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.
हरीश केंची म्हणाले की देशातील न्यायव्यवस्था प्रसार माध्यमे आदी महत्त्वाच्या स्तंभावर मोदी सरकारने हल्ले चढवून ते नष्ट केले आहेत. सामान्य माणसाला आवाज उठवण्यासाठी आता व्यासपीठ उरलेले नाही. लोकांच्या अधिकाराचा इतका संकोच यापूर्वी काँग्रेसच्या काळातही झालेला दिसला नाही असे ते म्हणाले.
संजय बालगुडे म्हणाले की या देशात न्यायव्यवस्थेलाही त्यांच्या मताप्रमाणे काम करता येत नाही ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशानी पत्रकार परिषदेत जाहीरपणे मांडली होती. राफेल प्रकरणात सत्य शोधन करायला निघालेल्या सीबीआय प्रमुखांच्या कार्यालयावर रात्री पोलिसांकरवी कारवाई केली जाते आणि मध्यरात्री त्यांची बदली केली जाते अशा प्रकारच्या अनेक उदाहरणातून देशातील लोकशाही प्रक्रिया संपुष्टात आणल्याचे संकेत मिळत आहेत.अविनाश गोडबोले म्हणाले की आज लोकशाही हा विषय औषधालाही शिल्लक राहिलेला नाही. प्रयोगशाळेत एखाद्या मृत माणसाचा सांगाडा आपल्याला जसा बघायला मिळतो तशी भारतीय लोकशाहीची अवस्था एखाद्या सांगाड्यासारखी झाली आहे त्यात प्राण फुंकण्याची गरज आहे.
आबा बागुल म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली या सरकारच्या काळात होत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आता नागरिकांनी उठाव करण्याची वेळ आलेली आहे. या सर्व बाबींना वेळेत रोखले नाही तर संविधानाने दिलेली स्वतंत्रता,समानता,धर्मनिरपेक्षता व इतर मूल्य नष्ट होतील व ते लोकशाहीसाठी घातक ठरेल यासाठी सर्वानी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे
आबा बागुल यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. लोकशाही वाचवण्यासाठी यापुढे असे उपक्रम सातत्याने घेतले जातील असे ते म्हणाले. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते दशरथ पोळेकर यांनी आभार मानले.