रणांगणातून पळ काढू नका…!- संजीव तांबोलकर
पुणे : “व्यवसाय हे रणांगणाचे एक स्वरूप आहे आणि त्यातील समस्यांना घाबरून तुम्ही पळ काढू नका.” असे उद्गार संजीव ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. संजीव तांबोलकर यांनी काढले. माईर्स एमआयटी स्कूल ऑफ बिझनेस(मिटसॉब)च्या 32व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एसएमआयएनक्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन भारद्वाज हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक (ग्रुप कॅप्टन) प्रा. डी. पी. आपटे, मिटसॉगच्या सहयोगी संचालिका प्रा.डॉ. एस.हरिदास व मिटसॉबचे डॉ. अविनाश देशपांडे, मिटसॉबचे सहयोगी संचालक प्रा.डॉ.अमित सिन्हा हे उपस्थित होते.
श्री. संजीव तांबोलकर म्हणाले, “ कोणत्याही व्यवसायात स्थिर होण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षांचा अवधी लागतो. प्रत्येक उद्योजकाला अत्यंत चिकाटीने वागावे लागते आणि स्वतःमधील सर्व शक्ती त्यात ओतावी लागते. यानंतरसुध्दा त्याने तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पध्दती या क्षेत्रात अद्ययावत असले पाहिजे. ज्या कंपन्यांनी ही काळजी घेतली नाही, ते आपले अस्तित्व टिकवू शकल्या नाहीत. तुम्ही जी दिशा निवडली आहे, त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे. उत्पादनाची निवड ही सुध्दा व्यवसाय चालविताना महत्त्वाची ठरते.”
श्री. सचिन भारद्वाज म्हणाले, “ तुम्हाला अर्थपुरवठा कसा होईल, याची चिंता करू नका. व्यवसायाकडे लक्ष द्या. अर्थसहाय्य आपोआप तुमच्याकडे चालत येईल. तुम्ही जर अर्थपुरवठ्याकडेच लक्ष देत बसलात, तर अगदी सुरवातीलाच तुम्ही दिवाळखोर बनाल. सुरक्षित नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये जास्तीतजास्त प्रयत्न करणे हे नेहमीच आवश्यक असते.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “स्वामी विवेकानंदांनी 1897मध्ये म्हटल्याप्रमाणे भारत हे जगाच्या ज्ञानाचे दालन होणार आहे. हे शब्द खरे करण्याची जबाबदारी तुमचीच आहे.”
प्रा. डी. पी. आपटे यांनी प्रास्ताविक केले व मिटसॉबचा अहवाल सादर केला.
डॉ. अविनाश देशपांडे यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली.
अपूर्व दावलभक्त व के.व्ही.श्रुती या विद्यार्थी प्रतिनिधींनी सूूत्रसंचालन केले.
प्रा.डॉ.अमित सिन्हा यांनी आभार प्रदर्शन केले.