विज्ञानाचा उपयोग ग्रामीण विकासासाठी करा डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे प्रतिपादन; चौथ्या ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेचे उद्घाटन
पंढरपूर, दि. 6 : “समाजसेवेचा वसा मला बाबांकडून थेट मिळाला व भामरागडच्या जंगलातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा प्रवास सुरू झाला.ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञान-विज्ञान संपादनाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या अविकसित क्षेत्रातील भावंडांच्या हितासाठी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे,” असे प्रतिपादन सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले.
माईर्स एमआयटी पुणेच्या विश्वशांती गुरुकुल निवासी विद्यालय, वाखरी, एमआयटी अॅकॅडमी इंजिनीअरिंग, आळंदी (पुणे) आणि दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या राष्ट्रीय पातळीवरील ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब बडवे, रोबोटिक्स युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. ओहोळ, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.स्वाती कराड – चाटे,एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या अॅकॅडेमिक्स – स्कुल्स डेव्हलपमेंट अॅन्ड ट्रेनिंगचे प्रकल्प संचालक डॉ.पी.एन.प्रसाद,एमआयटी एओई आळंदीच्या विभागप्रमुख प्रा.प्रभा कासलीवाल,एमआयटी विश्वशांती गुरूकुल पंढरपूरच्या प्राचार्या के. सुनिता व श्री. श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय स्पर्धेची यंदाची संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ अशी आहे.
डॉ. प्रकाश बाबा आमटे म्हणाले, “आपल्या देशात कमालीची विषमता आहे. एकीकडे अफाट संपत्ती आणि दुसरीकडे टोकाचे दारिद्र्य आहे. आज भारतात 40 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे, नवीन तंत्रज्ञान विकसित करावे व अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेवटच्या माणसाला दोन वेळचे जेवण मिळेल अशा प्रकारचा विकास करावा. आदिवासी भागातील अज्ञान, अंधश्रध्दा या दूर केल्या पाहिजेत. त्यांना त्या भागामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार उपलब्ध करून दिला तर, या भागाचा चांगला विकास होईल. ”
“हे सर्व घडण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. आज केंद्र सरकारकडून येणार्या विविध योजना आदिवासींपर्यंत जातच नाहीत. त्या मधल्यामध्ये झिरपून जातात. हे कसे होते याचा शोध घेऊन ते नाहीसे केले तर तेथील लोकांचे जीवनमान सुधारून आपल्या देशाची निश्चितच उन्नती होईल. थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मागासलेपणा नाहीसा झाला पाहिजे. ”
प्रा.डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, “ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या निमित्ताने निघालेली ही आळंदी ते पंढरपूर अशी ज्ञान-विज्ञानाची दिंडी आहे.पंढरपूर ही विकार-विकल्प दूर करणारी ज्ञान पंढरी व्हावी या दृष्टीने केला जाणारा हा प्रयत्न असून ज्ञानमयो विज्ञानमयोसी हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विश्वशांतीचा संदेश जगाला देण्याची वेळ आता आली असून त्यासाठीच्या कार्यक्रमात पीडित व आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणार्या डॉ.प्रकाश बाबा आमटे यांंच्यासारखा मार्गदर्शक आज लाभल्याने शुभाशिर्वाद लाभल्याचे समाधान मिळाले. ” ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून प्रगती पथावर जाणारा आपला देशच 21 व्या शतकातील जगाचा मार्गदर्शक बनणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “स्मार्ट सिटी संकल्पनेवर आधारित ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धा ही गांधींजींच्या स्वप्नातील स्मार्ट खेडी निर्माण करणारी ठरून पंढरपूर ही स्मार्ट ज्ञान पंढरी व्हावी हा या उपक्रमामागील प्रेरणास्त्रोत आहे.” नमामि गंगेप्रमाणे नमामि चंद्रभागा प्रकल्प सुरू करून येथे गीतेच्या 18 अध्यायांप्रमाणे घाट उभे करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
पंढरपूर येथे आयोजित 4थ्या राष्ट्रीय ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेत मुंबई,पुणे,कोल्हापूर,औरंगाबाद, सोलापूर,नागपूर,नांदेड, लातूर इत्यादी शाळांमधून 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून स्मार्ट सिटी संकल्पनेवर आधारित विविध रोबोंचे प्रात्यक्षिक या स्पर्धेतून ते दाखविणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.पी.एन.प्रसाद यांनी केले. रोबोकॉन स्पर्धेविषयीची विस्तृत माहिती व संकल्पना एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.स्वाती कराड – चाटे यांनी उपस्थितांना विशद केली. प्रा. प्रेरणा त्रिपाठी यांनी सूत्रसंचालन केले. गणेशकुमार यांनी आभारप्रदर्शन केले.पत्रकारदिनाचे औचित्य साधून याप्रसंगी पंढरपूरातील पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आळंदी ते पंढरपूल ही वारी रोबोच्या सहाय्याने दाखविली गेली. त्याला स्पर्धक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.