पुणे- “शाळा आणि घर ही शिक्षणाची दोन प्रमुख केंद्रे आहेत. औपचारीक शिक्षण हे शाळेत तर अनौपचारिक शिक्षण घरामध्ये मिळते. या दोन्ही ठिकाणाहून मिळणार्या संस्कारातूनच समाजात चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस निर्माण होतो.”असे उद्गार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर जी. चांदेकर यांनी काढले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या “वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०१८” या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी माजी प्राचार्य व पुणे जिल्हा पातळीवरील अधिकारी नानासाहेब निंबाळकर, व्ही. एस. सातव हायस्कूलचे प्राचार्य किसन जाधव हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, परीक्षेचे प्रमुख समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण व जयंत पाठक हेही उपस्थित होते.
डॉ.चांदेकर म्हणाले, “संयुक्त कुटुंबपद्धतीत मुलांमध्ये संस्कार रूजविले जात असत. येथे आजीच्या गोष्टींच्या माध्यमातून मुले व अंतिमतः समाज घडविला जात असे. पण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे सर्व अस्ताव्यस्त झाले आहे. वर्तमानकाळात संस्कार देणारे शिक्षण नसल्यामुळे याचा सर्वांनीच विचर केला पाहिजे. विश्वशांती केंद्राने आयोजित केलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त शिक्षण मिळत आहे. याचा फायदा आर्थिक उन्नतीसाठी होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण आंतरिक व्यक्तिमत्वाला जो आकार मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण आयुष्याची गुणवत्ता वाढणार आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण देणार्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला आकार येतो. त्यामुळे पुढील काळात संपूर्ण राज्यात या परीक्षेचा प्रसार झाला पाहिजे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, सबंध विश्वाला अशांतता आणि हिंसाचाराने ग्रासले आहे. हजार वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आमच्या देशाने आपली अस्मिता गमाविली आहे. ब्रिटीश लोकांनी तिच्यावर जाणीवपूर्वक आघात केले आहेत. पण या सर्व प्रश्नांवरची उत्तरे शेकडो वर्षांपूर्वींच आमच्या संतांनी दिली आहेत. त्यांच्या मार्गाने आपण गेलो, तर येणार्या काळात आपण सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकू.
नानासाहेब निंबाळकर म्हणाले, भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी ही परीक्षा सर्वत्र व्हावी. समाजात चांगली व्यक्ती घडविण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे. समाजात सकरात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य या अभ्यासक्रमात आहे.
किसन जाधव म्हणाले, भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी समाजाला अशा परीक्षांची आवश्यकता आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना होत आहे. अशा परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व उमलून येण्यास मदत मिळेल.
डॉ. एस.एन.पठाण यांनी या परिक्षेच्या उपक्रमामागची व विद्यार्थ्यांना सत्कारपूर्वक पारितोषिके देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. या पुढील काळात राज्यातील सर्वं शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी या प्रयत्नामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
या वेळी आकांक्षा सातव, ओंकार चौधरी व निकिता तांबडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जयंत पाठक यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवयानी पालवे यांनी आभार मानले.
–
सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यर्थ्यांचा सन्मान-
यावेळी कु. आकांक्षा गणेश सातव, व्ही. एस. सातव हायस्कूल, पुणे व कु. प्रतीक्षा रमेश सूर्यवंशी, मुकुंदराज माध्यमिक विद्यालय, नांदगाव, जि. लातूर या विद्यार्थ्यांनी राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान प्राप्त केला. त्यांना सुवर्णपदक, रु. ११,०००/- रोख बक्षीस, स्मृतिचिह्न व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितिय क्रमांक मिळविणारे कु. ओंकार अशोक चौधरी, व्ही. एस. सातव हायस्कूल, पुणे याला रौप्यपदक व रोख रु. ९,०००/- रक्कम, कु. निकिता कल्याण तांबडे, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, पुणे, कु. नेहा नथाजी भोकरे, श्री शिवाजी हायस्कूल, अकोट, जि. अकोला यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कांस्यपदक व रु. ७०००/- रोख रक्कम दिले. तसेच कु. खुशिया किशोर पाचाडे, कु. अपेक्षा दिगंबर गायकवाड, कु. किरण राजेंद्र गायकवाड, कु. सिद्धी रोहिदास जाधवराव व कु. वैष्णवी पद्माकर बन यांनी चौथ्या व पाचव्या क्रमांकावर यश प्राप्त केले. त्यांना अनुक्रमे रु. ५०००/- व रु. ३०००/- रोख बक्षीसे देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.