पुणे दि १३-कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल आणून बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथक दोनने अटक केली आहे. शरद शिवाजी मालपोटे (29, रा. सुतारदारा, कोथरूड ) आणि संदेश लहू कडू (24, काळूबाई कॉलनी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून यांना दोन पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ५ जानेवारी २०२४ ला साथीदार असल्याचा बहाणा केलेल्या आरोपींनी गोळ्या झाडून खून केला होता. या घटनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना, शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांना अटक केली असली तरीही या गुन्ह्यात आणखी काही साथीदारांचा समावेश असून त्यांचा देखील पोलीस तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन जणांनी शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठी संबंधित दोघांनी पिस्तूल देखील आणले होते. आणि हे दोघे खुनाचा कट इतर साथीदार यांच्यासोबत करत होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत या कटाची कुणकुण लागली आणि त्यांनी संशयित दोघांना सापळा रचून अटक केली.
मागील वर्षी पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळचा भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. शरद मोहोळ याचे सहकारी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व दोन साथीदारांनी गोळ्या झाडून हा खून केला होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले. मुळशीतील सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह १७ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-०१) गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, ओमकार कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, संजय आबनावे, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण, राहूल शिंदे, हनुमत कांबळे यांनी केलेली आहे.