नागपुर- उद्यापासून हिवाळी अधिवशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी सत्ताधाऱ्यांकडून चहापाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. परंतु या चहापाण्यावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज नागपुरात एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. गुंड आणि गुन्हेगारांना मंत्रिपदे देऊन राजकीय वर्चस्व वाढविणाऱ्या सरकारच्या चहापाण्याला जायचे काय ? असा सवाल या बैठकीतून करण्यात आला
राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णत: उद्ध्वस्त झालेली आहे. एका सरपंचाचा उचलून नेऊन खून केला जातो. त्या प्रकरणात राजकीय आरोपी आहेत. सरपंचांचा खून करण्याऱ्यांना पाठबळ असणाऱ्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राजकीय गुंडांना आश्रय देणारे सरकार असेल, तर चहापाण्याला जाण्यात काय अर्थ आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्राची अधोगती झाली आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतोय, महाराष्ट्रातील बेरोजगावर रस्त्यावर नागडे फिरण्याची वेळ आली आहे. उद्योगधंदे बाहेर पळाले. राज्यात गुंतवणूक येत नाही. गुंतवणुकदारांमध्ये महाराष्ट्राबाबत अनास्थ निर्माण झाली आहे. असे असताना दुसरीकडे पाठ थोपटण्याचे काम सुरू झाले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात शेतकरी रडतोय. त्याच्या माला भाव मिळत नाही. धान खरेदीचे केंद्र सुरू नाही, तसेच धानाचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. अशा स्थितीत पीकविम्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा व्हावी, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, यासाठी हे अधिवेशन अपेक्षित आहे. सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला चहापाण्याचे निमंत्रण मिळाले होते, परंतु आम्ही त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलांवर खुलेआम अत्याचार, बलात्कार होत आहेत. त्यासंदर्भात सरकारला गांभीर्य नाही. या राज्यातील सामान्य माणूस, शेतकरी यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची सरकारची भूमिका अधिवेशनाच्या अल्पावधीत दिसून येत नाही. म्हणूनच आम्ही चहापाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवण्याची मागणी केल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

