मुंबई-विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र मित्र पक्षांना एकही जागा सोडलेली नाही. महायुतीनेही रामदास आठवलेंच्या रिपाइंला ठेंगा दाखवला आहे.महायुतीकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंने बंडाचा पवित्रा घेतला आहे. महायुतीसोबतचा आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष तिसऱ्या आघाडीत सामील झाला आहे. त्यांचा प्रश्न येत नाही. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खाेत यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आधीच महायुतीतून बाहेर पडला आहे.
महाविकास आघाडीत उद्धवसेना, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट हे तीन प्रमुख पक्ष असून, शेकाप, समाजवादी पार्टी, माकप, भाकप हे घटक पक्ष आहेत. समाजवादीने मविआकडे धुळे शहर, मालेगाव मध्य, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम या पाच जागांची मागणी केली होती. मात्र पाचपैकी तीन जागांवर उद्धवसेना आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धवसेनेने धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे, काँग्रेसने मालेगावमधून एजाज बेग तर भिवंडी पश्चिमेतून दयानंद चोरघे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सपाचे आमदार अबू आझमी यांनी २५ जागावर लढण्याचा इशारा दिला आहे.
२०१९ मध्ये समाजवादी पार्टीने चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा निवडून आल्या. अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगरमधून तीन वेळा आमदार आहेत, तर सपाच्या रईस शेख यांनी २०१९ मध्ये भिवंडी पूर्वमधून १,३१४ मतांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मुस्लिमबहुल मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघही हवे आहेत. त्या ठिकाणी एमआयएमचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे समाजवादी पार्टीने या ठिकाणी दावा केला आहे. तसेच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परिणामी अबू आझमी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा वरदहस्त असलेल्या शेकापचा एक आमदार आहे. तरीही त्यांना पाच मतदारसंघात मविआने एबी फाॅर्म दिले आहेत. त्यामुळे शेकापने अलिबाग, पनवेल, उरण, पेण, लोहा कंधार या पाच ठिकाणांहून उमेदवारी जाहीर केली.