पुणे-मेट्रो, रेल्वे, उद्योग, शिक्षण, आरोग्य, अशा क्षेत्रात विकास झाला त्यामुळे देश प्रगतीपथावर आहे. ही बाब लक्षात आल्याने भारताविषयी विकसित देशांना आदर वाटत आहे. विविध देशांमध्ये देशात संधी आहेत. त्या संधींसाठी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.
यशस्वी ग्रुपच्या वतीने जागतिक स्तरावरील सध्याच्या उदयोन्मुख संधी या विषयावर आयोजित व्याख्यानात जयशंकर बोलत होते. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे राज्याचे सल्लागार राजेश पांडे, उद्योजक विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.
जयशंकर म्हणाले देशात आज मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत.दररोज १२ ते १४ किलोमीटर रेल्वे ट्रॅकची, तर दररोज साधारण २८ किलोमीटर रस्ते तयार होत आहेत. दिवसाला दररोज दोन कॉलेज कार्यान्वित होत असून, उद्योगांची सुरुवात होत आहे. जगातील विकसित देशांना ही गुंतवणुकीची संधी वाटते. सध्याच्या परिस्थितीत जगातील नामांकीत कंपन्यांचे सुमारे १८०० ग्लोबल कॅपॅबिलिटीज सेंटर विविध महानगरांमध्ये सुरू झाले आहेत. देशाच्या विकासासोबतच हे परिवर्तन वाढणार आहे. त्यासाठी देशात राजकीय स्थैर्य आवश्यक आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
जगातील काही देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तर काही देशांमध्ये तणाव. मात्र, त्यातही रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी भरपूर आहे. जागतिक संधींची सुरुवात आपल्या घरातून होते. त्यासाठी कशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. आपल्या युवकांना कौशल्यांचे योग्य प्रशिक्षण दिल्यास, उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होईल. देशात राजकीय स्थैर्य आणि चांगले सुशासन असल्यास, भारतीयांना जागतिक संधींचा लाभ घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, जर्मनीचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर असून, त्यात अनेक कुलगुरू, उद्योगपती आणि मंत्री आहेत. या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, विविध क्षेत्रात काम करण्याबाबत आश्वासन दिले आहे. त्यांनी दरवर्षी २० हजार भारतीय युवकांना नोकरीसाठी व्हिसा देण्याचे ठरवले आहे. मात्र, आम्ही ही संख्या ९० हजारांपर्यत वाढविण्याचे ठरविले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून अनेक देशांचे प्रमुख आणि शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी वेळ मागत आहेत. याहून भारताचे वाढलेले महत्त्व लक्षात घ्यावे लागेल.
कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले.सूत्रसंचालन अमृता करमरकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.