मुंबई–महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपखाडी येथून अर्ज भरणार आहेत. प्रचाराची औपचारिकता झाली असून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे कोकणाने त्यांची साथ सोडली. तेथे त्यांचा एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंना आव्हानच दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ठाकरे गटाने ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र, त्यांना यश आले नाही. कोकणात त्यांचा एकही खासदार आला नाही. आता एकही आमदार दिसणार नाही. त्यांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त झाले.
एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडी सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने बंद पाडलेले, स्टे दिलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, असा दावा त्यांनी केला. आम्ही लाडकी बहीण सारख्या अनेक कल्याणकारी योजना आणल्याचेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रास मोठ्या प्रमाणावर उद्योग आले असून विकास आणि योजना यांची सांगड घालण्याचे काम आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जनता निवडणुकीत आमच्या कामाची पोचपावती देईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बहुमताने येईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली, त्याचवेळी काँग्रेसचा एक वडपल्लीवार न्यायालयात गेला. मात्र हायकोर्टाने त्यांना चपराक दिली होती. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीच्या पोटात सलतीये. त्यांना आता जनता साथ देणार नाही. कोणीही माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचे पैसे वाढत जातील. योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लोक खाली बसवतील, अस घणाघणात एकनाथ शिंदेंनी केला.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील जागावाटपावर सुरू असलेल्या वादावर देखील भाष्य केले. सध्या महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल. याबाबतच्या काही बाबी नंतर सांगितल्या जातील. आमची दुसरी यादी उद्या येईल, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मशालीविरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. त्यावेळी फेकाफेकी करुन, फेक नेरेटिव्ह करुनही धनुष्यबाण भारी पडला होता. लोकांना फसवून देखील लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा चांगला होता. कामाच्या जोरावर महायुतीचा विधानसभेला स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल. महायुती सर्वांना चारीमुंड्या चित करेल. या निवडणुकीत आमचे लोक चौकार -षटकार मारतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. लोकसभेत आम्ही 13 जागा समोरासमोर लढल्या. त्यातील 7 जागा आम्ही जिंकल्या. आमचा 47 टक्के स्ट्राईक रेट होता, तर त्यांचा 40 टक्के स्ट्राईक रेट होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले.