उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले,पुण्यात ठाकरे गटाला एकही जागा नाही
पुणे-पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर 6 तास थांबलो. पण त्यांनी केवळ 40 सेकंद आम्हाला दिले. ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली असून, आम्ही यापुढे त्यांचे काम करणार नाही, असे बाबर यांनी म्हटले आहे.
शरद पवार गटाने हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणाहून ठाकरे गटाचे महादेव बाबर इच्छुक होते. पण ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवत हडपसर येथून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत.महादेव बाबर म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो. तिथे तब्बल 6 तास त्यांची वाट पाहिली. पण त्यांनी केवळ 40 सेकंद आम्हाला दिले. उद्धव यांनी शिवसेना पुणे जिल्ह्यातून हद्दपार केली आहे. त्यांना येथून एकही जागा आपल्या पक्षासाठी मिळवता आली नाही. त्यामुळे शिवसेना केवळ मुंबईपुरती मर्यादित राहिली आहे. यामुळे सर्व शिवसैनिक नाराज झालेत. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला. पण तिथेच ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही.
आम्ही आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धडा शिकवू. या प्रकरणी केवळ मीच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा नाराज आहे. शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात मशालीचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी काम कसे करायचे? पुणे जिल्ह्यात मशाल कशी पोहोचवावी? मी याविषयी लवकरच माझ्या समर्थकांचा मेळावा घेईल.
महादेव बाबर म्हणाले, पक्षप्रमुखांना आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. मी आजपासूनच शिवेसनेचे काम करणार नाही. काही दिवसांपूर्वी मी संजय राऊत यांना भेटलो. त्यात त्यांनी शरद पवार स्वतः माझे नाव सर्व्हेत आघाडीवर असल्याचे सांगितले होते. याचा अर्थ संजय राऊत साफ खोटे बोलले.उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मी व माझे सहकारी तब्बल 6 तास थांबलो. पण ठाकरेंनी केवळ 40 सेकंद आमच्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी केवळ प्रयत्न सुरू आहेत असे वाक्य उच्चारले. त्यानंतर ते निघून गेले, असेही महादेव बाबर यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना म्हणाले.