पुणे-विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात शुक्रवारी सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका टेम्पोतून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. आचारसंहिता काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने पकडले गेल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली. पण चौकशीअंती हे सोने बेकायदा नव्हे तर एका सोने डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी नाकेबंदीत पकडलेल्या या सोन्याची माहिती निवडणूक अधिकारी व आयकर विभागालाही दिली. त्यानंतर जप्त करण्यात आलेले सोने पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, सहकारनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरु असताना, मुंबईच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचा टेम्पाे एमएच 02 ईआर 8112 हा पुण्यात आला होता. सिक्वेअल कंपनीचा सदर टेम्पाे सहकारनगर परिसरातून जात असताना पाेलिस पथकाने त्याला थांबवून त्याची तपासणी केली. त्यात टेम्पोत पांढऱ्या पोत्यांत बॉक्स ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून त्याची पाहणी केली असता त्यात 138 किलाे साेने असल्याचे दिसून आले. सदर सोने हे मुंबईतील एका साेने डिलीव्हरी करणाऱ्या कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याबाबतची कागदाेपत्री तपासणी आयकर विभाग करत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याच्याच खेड – शिवापूर परिसरात सोमवारी रात्री एका कारमधून तब्बल 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे अवघे राजकारण ढवळून निघाले होते. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ही रोख रक्कम सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे असल्याचा आरोप केला होता. पण त्याची पुष्टी झाली नव्हती.