पुणे – महाराष्ट्र भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्य आणि चौफेर संघटनशैलीने महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पांडे यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेत पक्षाने पांडे याना ही नवी जबाबदारी दिली आहे. याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समाजमाध्यमावर (एक्सवर) पोस्ट करून माहिती दिली आहे.
मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 40 वर्षापासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. दहा वर्ष पूर्ण वेळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले. परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपने 1993 मध्ये मुंबईत सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढला होता. त्याचे नेतृत्व आणि नियोजन पांडे यांनी केलेले. तेव्हापासूनच त्यांच्या संघटन कौशल्याची चुकून दिसून आली.
अलीकडच्या काळात भाजप उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले. मेरी माती मेरा देश, हर घर तिरंगा असे अभियान त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहचवत गिनीज रेकॉर्ड पूर्ण केले. याशिवाय जी२० परिषद, अयोध्या दर्शन अभियान असे अनेक संघटन उपक्रम त्यांनी पूर्ण ताकदीने यशस्वीपणे राज्यभर अमलात आणले. पुणे पुस्तक महोत्सवाचे ते आयोजक आणि संयोजक असून आतापर्यंत ७ गिनीज रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.
शिक्षण, सहकार, साहित्य, कौशल्य विकास आणि रोजगार, आरोग्य, क्रीडा, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रात पांडे यांनी युवा सक्षमीकरणावर काम केले आहे. लोकसहभाग हा त्यांच्या कामाचा गाभा राहीला आहे. संघटन कौशल्य आणि सर्वपक्षीय जनसंपर्क हि त्यांच्या राजकीय कामाची ओळख सांगितली जाते.
नवीन जबाबदारी स्वीकारताना मी देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आभार मानतो. विधानसभा निवडणुका सुरु झालेल्या आहेत. पक्षाच्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे संघटनेचे संपूर्ण लक्ष्य भाजप आणि महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येण्यासाठीच्या नियोजनावर आहे. निवडणुकीसाठी बूथ रचना, सरकारच्या लोककल्याणकरी योजना लोकांपर्यंत पोहचवणे यावर सध्या काम सुरु आहे. – -राजेश पांडे, महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश, भाजपा