मातंग साहित्य परिषदेतर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार
डॉ. अशोककुमार पगारिया यांचा डॉ. श्रीपाल सबनीस समाजकार्य तर डॉ. राजा दीक्षित यांचा डॉ. श्रीपाल सबनीस विचारवंत पुरस्काराने गौरव
पुणे : ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ ही संकुचित भूमिका मान्य नाही तर ‘सकलजन हिताय, सकलजन सुखाय’ ही भूमिका मी मानतो. मला डावे-उजवेही मान्य नाही. मी चांगुलपणाच्या बेरजेचे तत्त्वज्ञान समाजात रुजवू पाहतो आहे, यासाठीच माझे जगणे व मरणे आहे. जातीच्या जाणिवांच्या पलिकडे जाऊन प्रेम करणे मला मान्य असून माझ्या तत्त्वात शुद्ध अंत:करणाची बेरीज आहे, असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. प्रत्येक जाती-धर्मात चांगले-वाईट अनुभवायला मिळत असताना मातंग साहित्य परिषदेकडे संवादाचे व्यासपीठ म्हणून बघतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते. डॉ. सबनीस यांचा सत्कार कोहिनूर ग्रुपचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती तर मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात डॉ. अशोककुमार पगारिया यांचा डॉ. श्रीपाल सबनीस समाजकार्य पुरस्काराने तर डॉ. राजा दीक्षित यांचा डॉ. श्रीपाल सबनीस विचारवंत पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे, ललिता सबनीस मंचावर होते.
अभिजन आणि बहुजन यांना एकत्र करण्याची कृती मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून होत आहे, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, आज बहुजनामध्येही जातीवाद पोसला जात आहे. राजकारणी देखील स्वार्थासाठी असत्याची बेरीज करीत आहेत. परंतु मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून केली जाणारी बेरीज ही सत्यासाठी होत आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, डॉ. सबनीस हे कृतीशिल विचारवंत आहेत, त्यांची दृष्टी मानवतेची असून त्यांचे कार्यही महान आहे. प्रभुणे, डॉ. पगारिया, डॉ. दीक्षित यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
गिरीश प्रभुणे म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस हे खरोखरच विवेकवादी विचारवंत असून महाराष्ट्रासह राजकारणात आज न आढळणारा विवेकवाद डॉ. सबनीस जपत आहेत. डॉ. भिसे यांची चळवळ समन्वय आणि विवेकवादी आहे. त्यांच्या भूमिकेला सबळ करण्यात डॉ. सबनीस यांचा मोलाचा वाटा आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य भाऊसाहेब जाधव म्हणाले, डॉ. सबनीस यांच्या वागण्या-बोलण्यात निस्वार्थीपणा आहे. त्यांचे कार्य महान आहे. ते सर्व समाजात वावरणारे आणि मानवतावाद जपणारे आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपलेपणाची भावना आहे.
पुरस्काराबद्दल डॉ. राजा दीक्षित आणि डॉ. अशोककुमार पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. धनंजय भिसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती विशद केली. आभार डॉ. संतोष रोडे यांनी मानले.