पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गुरुवारी भर पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्यांनी वळसेंची उमेदवारी आपल्याला मान्य नसल्याची टीका करत पत्रकार परिषदेतच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली. यामुळे महायुतीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
दिलीप वळसे पाटील गुरुवारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या परिषदेत शिंदे गटाच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी वळसेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला. ते म्हणाले, मला या ठिकाणी पक्षाची बैठक असल्याचे सांगून बोलावण्यात आले होते. पण प्रत्यक्षात येथे दुसराच ठराव घेतला जात आहे. हा प्रकार मला मान्य नाही. वळसेंनी आम्हाला वेळोवेळी त्रास दिला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविरोधात आम्ही इथे आताच्या आता पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करत आहोत.
विजय आडारी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती निवडून आणताना आणि इतर सर्व कामांत आम्ही त्यांना मदत केली. पण त्यानंतरही त्यांनी आदिवासी भागात आम्हाला खूप त्रास दिला. सद्यस्थितीत मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढत आहे. आम्हाला इथे पक्षाची बैठक असल्याचे सांगून बोलावण्यात आले. पण इथे दुसराच ठराव घेतला जात आहे. त्याची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. मी जिल्ह्याचा आदिवासी प्रमुख म्हणून काम करतो. मी आत्ता या क्षणी पक्ष सोडण्याची घोषणा करत आहे. मी माझी पुढील भूमिका आताच स्पष्ट करमार नाही. पण आमचा दिलीप वळसे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे.उल्लेखनीय विजय आडारी यांच्या या भूमिकेमुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर फूट पडल्याचे चित्र आहे.