पुणे-नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली. त्यामुळे ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर बदनाम झाले, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते, सावरकरांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी सांगितले.
पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे शरद पोंक्षे यांना डॉ. दा. वि. नेने स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.कर्वेरस्ता, कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी ते म्हणाले की, १९४६ पासून सावरकर सांगतात ते खरे होताना पाहून त्यांची व हिंदू महासभेची ताकद वाढत होती. त्यामुळे आपण १९५२ च्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार हा प्रश्न नेहरूंना भेडसावत होता. ते एका चमत्काराची अपेक्षा करत होते. तो चमत्कार घडवला गोडसेने. त्याने ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या केली.
ब्राह्मण समाज, हिंदुत्व व हिंदू महासभेचे नेतृत्व करणारे सावरकर बदनाम झाले. त्यांच्यावर काळा डाग लावण्याची आयती संधी नेहरूंकडे चालून आली. गांधी हत्येच्या कटात सामील असल्याचा ठपका ठेवत सावरकरांना आरोपी क्रमांक ८ बनवण्यात आले. १९३७ साली सावरकरांना काँग्रेसमध्ये सामील होण्याचे निमंत्रण होते, परंतु काँग्रेसने स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवाद व पराकोटीचं मुस्लिमांचं लांगूलचालन यामुळे त्यांनी त्यास नकार दिला.
स्वतः सुप्रीम कोर्टात ५ वेळा माफी मागणारा काँग्रेसचा नेता जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही, असे म्हणतो. सावरकर जाऊन ५८ वर्षे लोटली असली तरी दर २ महिन्यांनी काँग्रेस त्यांच्यावर चिखलफेक करते. यावरूनच आजही सावरकरी विचारांची दहशत कायम असल्याचे दिसते, असे पोंक्षेंनी सांगितले.

