देशाच्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने धूडगूस घालण्याचा प्रयत्न केला. या तरुणासोबत हरियाणाची एक महिलाही होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. या घटनेमुळे अवघ्या देशात हल्लकल्लोळ माजला. या घटनेनंतर लातूर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या गावात जावून चौकशी केली असता त्यांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, संसदेत धुडगूस घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लातूरच्या तरुणाचे नाव अमोल धनराज शिंदे असे आहे. दिल्ली पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना या तरुणाची माहिती काढण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अमोल शिंदे याच्या लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावात धाव घेतली.
लातूर पोलिसांनी अमोल शिंदेच्या झरी गावात जावून त्याच्या आई – वडिलांची चौकशी केली. त्यांनी आपला मुलगा 15 दिवसांपूर्वी कोणत्या तरी कामानिमित्ताने दिल्लीला गेल्याची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल शिंदेच्या घरची माहिती अत्यंत बेताची आहे. त्याचे आई – वडील मजूर आहेत. ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. ते काबाडकष्ट करून अमोलला शिकवतात.
पोलिसांनी घेतली घराची झडती
अमोल शिंदे गत काही दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी करण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. त्यांनी यासंबंधी झरी गावच्या नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातलगांशीही त्यांनी संवाद साधला. पण त्यांना अमोलविषयी फारशी माहिती मिळाली नाही. पण त्यांना अमोलला आपल्या गावात राहणे फारसे आवडत नव्हते, असे समजले. पोलिसांनी अमोलच्या शैक्षणिक दस्तावेजांचीही पडताळणी केली. तसेच त्याच्या घराचीही झडती घेतली.
अमोल दिल्लीला का गेला?
संशयित तरुणाच्या आई-वडिलांनी अमोल गत अनेक दिवसांपासून पोलिस भरतीची तयारी करत असल्याची माहितीही पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. अमोल शिंदे पोलिस भरतीची तयारी करत होता. यासाठी तो कुटुंबीय व गावापासून दूर राहत होता. 15 दिवसांपूर्वीच तो आई – वडिलांना सांगून दिल्लीला गेला होता. तो दिल्लीला का गेला? तिथे त्याचे नेमके काय काम होते? त्याच्यासोबत कोण – कोण होते? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.
मुलाला फाशी द्या, वडिलांची मागणी
दुसरीकडे, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या म्हैसूर येथील एका तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाला फाशी देण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलाने बीईचे शिक्षण झाले आहे. एच डी देवेगौडा यांच्यामुळे माझ्या मुलाला बीईला प्रवेश मिळाला होता. तो नेहमी दिल्लीला जायचा. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्या मुलाने असे का केले, हे मला माहिती नाही. असे कृत्य करणारा माझा मुलगा असूच शकत नाही. त्याने चूक केली असेल तर त्याला फाशी द्या, असे ते म्हणालेत.