पुणे-मोहन भागवत यांच्या या विधानावरून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे. मोहन भागवत काय म्हणाले याची मला कल्पना नाही. ते कुणाविषयी बोलले हे ही मला माहिती नाही. पण कुणीतरी मध्यंतरी देव बनायला निघाले होते. त्यावर आता भाजप व आरएसएसचेच लोक बोलत आहेत. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्याच्या आंबेगावात आयोजित पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये माणूस देव होण्याचा प्रयत्न करत असल्याचे विधान केले होते. मनुष्य असूनही मानवता नसणाऱ्या लोकांनी आधी माणूस होण्याची गरज आहे. काही लोक मानव असताना सुपरमॅन बनू पाहतात. अलौकिक शक्ती असल्याचे म्हणत ते अलौकिक बनू पाहतात. सुपरमॅन बनू पाहतात. पण ते तिथेच थांबत नाहीत. त्यांना वाटते आपण देव व्हावे. ते देव बनू पाहतात. पण देव म्हणतात की आमच्यापेक्षा भगवान मोठे आहेत. मग तो मनुष्य भगवान बनण्याचा प्रयत्न करतो. आता हे लोक इथेच थांबणार आहेत की त्यांना त्यापुढेही कुठे जायचे आहे? असे मोहन भागवत म्हणाले होते.
शहाण्या माणसांनी नोंद घ्यावी
शरद पवारांनी यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न का सोडवले नाहीत? हे त्यांना विचारा. ते कितीतरी वर्षांपासून सत्तेत आहेत. ते 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री होते. ज्यांना 25 वर्षांत विकास करता आला नाही, ते आता काहीतरी सांगत आहेत. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊनही कामे करता आली नाही. जनतेला न्याय देता आला नाही. यावर आता उत्तर शोधावे लागेल. यासाठी राज्याची सत्ता हाती घ्यावी लागेल, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावरही आपले मत व्यक्त केले. मी जी माहिती घेतली ती देशाच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. अधिकाऱ्यांनी या चौकटीबाहेर जाणे अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
कुणीतरी देव बनायला निघाले होते:भाजप अन् RSS चे लोक त्यावर बोलत आहेत, शहाण्यांनी नोंद घ्यावी; पवारांचा मोदींना टोला
Date:

