मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46 वरुन 50 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. 1 जानेवारी व 1 जुलै या तारखांना ही वाढ केली जाते. पण निर्णय उशिरा घेतला जातो. त्यानुसार सरकारने आज बुधवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलैपासून 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार, ही वाढ 1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 च्या वेतनाबरोबर रोखीने दिली दिली जाणार आहे. शासकीय व निमशासकीयसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी 23 नोव्हेंबर 2023 रोजी महगाई भत्ता वाढवण्यात आला होता. 42 वरून 46 टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता. त्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता. जानेवारीत महागाई भत्ता वाढला नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यानुसार आता जानेवारीपासूनचा महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, केंद्राने यापूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

