कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मुळगांवी शिरवाडे वणी येथे ९ जुलै ला पहिला कार्यक्रम
पुणे, ५ जुलैः वृक्षारोपण महायज्ञ सारख्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजिक वनीकरण विभागाकडून सरपंच संसदेला पूर्ण सहकार्य असेल. असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत स्थापित राष्ट्रीय सरपंच संसद आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वृक्षारोपण महायज्ञ उपक्रमाचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले, नागपूर विभागाचे समन्वयक संजय गजापुरे, मुंबई महानगर समन्वयक चंद्रकांत पाटील, कल्याण डोंबिवली महानगर समन्वयक जितेंद्र पाटील उपस्थित होते.
या उपक्रमातील पहिला कार्यक्रम कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मुळगांवी शिरवाडे वणी येथे ९ जुलै रोजी संपन्न होणार असल्याने वनमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्शगाव हिवरेबाजारचे शिल्पकार पद्मश्री पोपटराव पवार हे असतील.
शिरवाडे वणी येथील कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याच्या १५ तालुक्यातील राष्ट्रीय सरपंच संसदे चे सदस्य असणार्या १२० ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ४० प्रकारच्या वृक्षजातीचे १ लाख २० हजार वृक्ष रोपे वितरित करण्यात येणार आहेत.
वृक्षारोपण महायज्ञ उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सरपंच संसदेचे सदस्य असणार्या महाराष्ट्र राज्याचे ३४ ग्रामीण जिल्ह्याच्या ३५१ तालुक्यातील ३४०० ग्रामपंचायत गावांमध्ये ३४ लक्ष वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
लोकसहभागातून वृक्षारोपणाची संकल्पना एमआयटी शिक्षण संस्थासमूहाचे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय विधायक संमेलनाचे प्रणेते व राष्ट्रीय सरपंच संसदचे संस्थापक राहुल कराड यांची आहे. तसेच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मार्गदर्शक आहेत.
यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील ३४ ग्रामीण जिल्ह्यात वृक्षारोपण महायज्ञ उपक्रमाच्या कार्यवाहीचे अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन केले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी दिली.