पुणे :पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित ‘हिरवाई महोत्सव’ च्या पहिल्या दिवशी ४ जुलै रोजी ‘वनस्पतींच्या नावाभोवतीच्या कथा’ विषयावर डॉ. मंदार दातार यांचे व्याख्यान झाले.वनस्पतींच्या नामकरणाची प्रक्रिया ,त्यामागील शास्त्र आणि रंजक किस्से त्यांनी सांगितले. त्यातून वनस्पतींच्या नावामागच्या कथा उलगडल्या ! या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. राजीव पंडित यांनी स्वागत केले.
डॉ.मंदार दातार म्हणाले, ‘ परदेशातून विविध कारणाने आलेल्या लोकांनी वनस्पती आणल्या. तसेच एतद्देशीय वनस्पतींना नावे देण्याचा प्रयत्न केला. अनेक महनीय व्यक्तींच्या स्मरणार्थ वनस्पतींची नावे दिली गेली. बंदरांमुळे पोर्तुगिजा नी थेट महाराष्ट्रात अनेक वनस्पती आणल्या. मूळ नावातील साधर्म्य तसेच राहिले. ते हिंदीत मात्र गेले नाही.अनेक नावे मराठीत विविध कारणाने आली.
मिर्चीचे नाव मिरीवरून आले. आधी स्वादासाठी मिरी वापरली जायची. गूळ करण्याचे तंत्र भारतात होते, मात्र साखर करण्याचे तंत्र चीन वरून आल्याने हिंदीत साखरेला चीनी हे नाव पडले.
बेरी, ऍपल हे शब्द अनेक फळांना इंग्रजांनी जोडले. पोर्तुगीज, स्पॅनिश लोकांनी मात्र महाराष्ट्रातील वापरातील नावे कायम ठेवली. दक्षिण अमेरिकेतील नावे काजू सारखी नावे मराठीत वापरली जात आहेत. तिकडे अकाजू म्हटले जायचे.
रामफळ वेस्ट इंडीजमधून आले आहे. ते सीताफळासारखे दिसते म्हणून रामफळ हे नाव दिले गेले. अननस हे नाव ब्राझिलमधून आले. शेंगदाणा दक्षिण अमेरिकेतून आला. आपल्याकडे मूग होताच, भूईवर येणारा शेंगदाणा मुगाशी जोडला गेला आणि भूईमुग झाला !, असेही डॉ. दातार यांनी सांगीतले.
बटाटा हे नाव प्रत्यक्षात पटाटा आहे. पण, मराठीत तो बटाटा झाला. बंदरांमुळे पोर्तुगिजा नी थेट महाराष्ट्रात अनेक वनस्पती आणल्या. मूळ नावातील साधर्म्य तसेच राहिले. ते हिंदीत मात्र गेले नाही.
वनस्पतींची नावे द्वी -नामी देण्याची पध्दत कार्ल लीनाईस ने सुरू केली. १३ हजार वनस्पतींना त्याने नावे दिली. बडोदा रेल्वेचे काम करणाऱ्या थिओडर कुक ने वनस्पतींमध्ये खूप रस दाखवला, अभ्यास केला. पुस्तके प्रकाशित केली. जोसेफ हुकर, सांतापाऊ अशा अनेक अभ्यासकांच्या योगदानाची माहिती डॉ.दातार यांनी दिली. भारतात वनस्पतींचे पहिले रंगीत पुस्तक हुकर ने काढले, असेही डॉ. दातार यांनी सांगितले.
दि. ४ ते ७ जुलै दरम्यान भावे प्राथमिक शाळेचा नवीन हॉल(सदाशिव पेठ) येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून वनस्पती,प्राणी,हिरवाई आणि पर्यावरण रक्षणाची चर्चा करणारी व्याख्याने, जनजागृती असे या महोत्सवाचे स्वरूप आहे.’जीविधा’ संस्थेचे संस्थापक राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले.स्थानिक देशी वनस्पतींच्या लागवडीत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी ‘हिरवाई महोत्सव’आयोजित करते.या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष आहे.
दि. ४ ते ७ जुलै दरम्यान सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत व्याख्याने होणार आहेत.दि.५ जुलै रोजी लेखिका मृणालिनी वनारसे यांच्या ‘सोनवारा – अर्थात बागेतल्या रानव्याची गोष्ट ‘ या कादंबरीचे वाचन होणार आहे.६ जुलै रोजी ‘उत्क्रांतीच्या पाऊलखुणा – पाषाणातील वनस्पती जीवाश्म’ या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर बोलणार आहेत.७ जुलै रोजी जीविधा संस्थेचा वर्धानपनदिन साजरा केला जाणार आहे.त्या अंतर्गत ‘पुणे विल्डरनेस’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.राजीव पंडित व अनुज खरे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. न्या.श्रीराम मोडक ( मुंबई उच्च न्यायालय) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यानिमित्ताने अनुज खरे व राजीव पंडित यांच्या जंगलातील अनुभवांवर आधारीत मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून डॉ.महेश शिंदीकर त्यांच्याशी संवाद साधतील. महोत्सवातील सगळे कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुले आहेत.