पुणे-एकीकडे विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे पुण्यातील पार्वती विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत तयारीला प्रारंभ झाला आहे. आपण लढणारच..असा पवित्रा घेऊन कॉंग्रेसच्या आबांच्या सह आता भाजपच्या आबांनी ही रणांगणात उडी घेतली आहे. कॉंग्रेसच्या आबा बागुलांची कहाणी सर्वश्रुत आहेच.प्रत्येक वेळी पक्ष हित डोळ्यासमोर ठेऊन नेत्यांचे ऐकत आलेले आबा बागुल अखेरपर्यंत नगरसेवक पदावरच कायम राहिले.आणि आता ते राजकीय कारकिर्दीतील आपली हयात या विधानसभेत पणाला लावत असताना भाजप मधील आबा म्हणजे राजेंद्र शिळीमकर यांनीही पक्षात आता नवे चेहरे आणण्यात येतील असे सांगत विधानसभेच्या प्रचाराला देखील प्रारंभ केला आहे.या २ आबांच्या रणधुमाळीत भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना यावेळी उमेदवारी नाकारली जाईल असेच चित्र राजकीय वर्तुळातून दिसून येते आहे.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-04-at-14.50.26-1024x813.jpeg)
माधुरी सतीश मिसाळ या महाराष्ट्राच्या १३ व्या आणि १४ व्या विधानसभेचे सदस्य होत्या.त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत. पण तरीही सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय या पासून त्या नेहमीच अलिप्त राहिल्याचा आरोप होतो.सतीश मिसाळ,बाबा मिसाळ यांच्या नावाची पाठराखण आणि सहकारनगर मधील भाजपचा मतदार या ताकदीवर त्यांनी ३ वेळा आमदारकी प्राप्त केली आता मात्र पार्श्वभूमीवरच यावेळी पर्वतीमध्ये नवा चेहरा दिला जाईल असे भाजपा मधील सूत्रांचे म्हणणे आहे. आणि म्हणूनच पुढे होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीची देखील पर्वा न करता भाजप मधूनच मिसाळ यांच्या उमेदवारीस आव्हान देणारी २ नावे पुढे येत आहेत.ज्यातील पहिले नाव शिळीमकर याचे आहे तर दुसरे महापालिकेत सभागृहनेते पद भूषविलेले श्रीनाथ भिमाले यांचे. शिळीमकर गेली ३२ वर्षे भाजपात आहेत २ वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आलेत. महापालिकेत २२ समित्या आहेत प्रत्येक समिती अध्यक्षाला कार्यालय,मोटार अशा सुविधा असतात. 5 वर्षात या २२ पदांवर ११० नगरसेवकांची वर्णी लावता येऊ शकते अशा स्थितीत देखील मराठा समाजाच्या शिळीमकर यांना कुठल्याही समितीचे अध्यक्षपद मिळालेले नाही.त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांत आहेच.आता याच आबा शिळीमकर यांनी विधानसभेसाठी रणांगणात उडी घेतली आहे, केवळ उमेदवारी मिळविण्यासाठी नाहीतर आमदारकी मिळविण्यासाठीच आपण उतरलो असल्याचे ते कार्यकर्त्यांना सांगत आहेत.
सद्गुरू शंकर महाराज मठ आणि त्या अनुषंगाने दक्षिण पुण्यात सामान्यातल्या सामान्य माणसासाठी केलेल्या कामाच्या बळावर आणि पर्वती मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या योजनांच्या बळावर आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर सांगायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसच्या आबा बागुलांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचे शहराबाबतचे व्हिजन याची अनेकांना कल्पना आहे. नवनवीन प्रकल्प राबविण्यात आबा बागुलांचा हातखंडा आहे. वाहतुकीची समस्या असो,पर्यावरणाचे संवर्धन असो,घराघरातील कौटुंबिक समस्या असो बागुलांनी त्या आपल्या कारकिर्दीत नेहमीच सोडविण्यासाठी वेळ दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी सुरू केलेल्या काशी यात्रे ने महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घातले आणि मग सर्वत्र त्याची कॉपी सुरु झाली.पण या माध्यमातून आबांनी घराघरात आपला संपर्क कायम ठेवला. आणि आधुनिक श्रावण बाळ म्हणूनही लौकिक मिळविला.आता या दोन आबांनी विधानसभेची ही लढाई सुरु केली आहे.कॉंग्रेस,शरद पवारांची राष्ट्रवादी,अजित दादांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना,शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या सर्व पक्षांचे नेते उमेदवारी बहाल करताना नेमकी कोणती भूमिका घेतील ते आताच ठरविणे कठीण असले तरी लढाईची रणनीती आखली जाऊ लागली आहे.