उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली. यामध्ये 122 जणांचा मृत्यू झाला. 150 हून अधिक जखमी आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत.काही माध्यम प्रतिनिधींनी सिकनारौ सीएचसी, हाथरसमध्ये मृतदेहांची मोजणी केली. येथे 95 मृतदेह विखुरलेले आहेत. याशिवाय एटा सीएमओ उमेश त्रिपाठी म्हणाले – आतापर्यंत हातरसमधून 27 मृतदेह एटामध्ये आणण्यात आले आहेत. यामध्ये 25 महिला आणि 2 पुरुष आहेत. सीएमओ म्हणाले- मृतदेह आणि जखमींना टेम्पोमध्ये आणण्यात आले. मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम केले जाईल. सत्संगात 20 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती.
हाथरसपासून 47 किमी अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला. अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस-टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. सीएम योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवले. घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांची एक टीम तयार करण्यात आली आहे.