मुंबई-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ करत राज्य शासन आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू धर्मातील नागरिकांविषयी काढलेल्या अपशब्दाचा मुद्दा विधान परिषदेमध्येही गाजला होता. या सभागृहात निषेध ठराव घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या विषयी बोलताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. तसेच दानवे यांनी राजीनामा देऊन सर्वांची माफी मागावी, अशी मागणी देखील लाड यांनी केली होती. आज सभागृहाच्या पायऱ्यांवरही लाड यांनी आंदोलन केले होते.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात वापरलेल्या आपल्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले आहे. मी समोरच्याचे काहीही सहन करणार नाही. मी शिवसैनिक असून, त्याच बाण्याने उत्तर दिले, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने देखील दानवे यांची बाजू घेत त्यांचे समर्थन करण्यात आले होते.
सभागृहात शिवीगाळ केल्यानंतर मी असेल उत्तर देईल, असा कोणाचा बाणा असेल तर तो चुकीचा पायंडा असल्याचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. सभागृहात अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग होतोय, एक महिला उपसभापती किंवा महिला सदस्य सभागृहात उपस्थित होते. अशा प्रकारचे वर्तन विधिमंडळात होत असेल तर इतर नगर पालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या ठिकाणी महिलांना काम करणे अवघड होईल, असेही निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.