नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी-15 जुलैची मुदत व्यवहार्य नाही-21 वर्षांवरील अविवाहित महिलांचा काय दोष?६० वर्षावरील महिलांचा दोष काय ?
मुंबई-महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची तोबा गर्दी उसळली आहे. त्यात अमरावती व सोलापुरातील केंद्रांवर एजंटकडून या प्रकरणी 700 ते 800 रुपये घेऊन महिलांची लूट केली जात असल्याची बाब उजेडात आली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना या योजनेच्या नोंदणीसाठी सरकारने ठेवलेली 15 जुलैची अट रद्दबातल करण्याची मागणी केली आहे.
अमरावतीच्या वरूड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोलापुरातही महिलांनी या योजनेसाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी एजंटांकडून महिलांकडून दाखले देण्यासाठी 700 ते 800 रुपये घेतले जात आहेत.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी ठेवण्यात आलेली 15 जुलैची अंतिम मुद्द रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, यंदाच्या अर्थसंकल्पात शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिलांना मदत दिली पाहिजे, त्यात कुणाचेही दुमत नाही. पण या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील नोंदणी केंद्रांमध्ये प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी होईल, एवढी मोठी गर्दी दिसत आहे. काही ठिकाणी तर उन्हात उभे राहिल्यामुळे भोवळ येण्याच्याही घटना घडल्या आहेत, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सध्या पंढरीची वारी सुरू आहे. गावोगावच्या पालख्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले आहे. यात अर्ध्याहून अधिक महिला असतात. आषाढी एकादशी 17 तारखेला आहे. त्यामुळे वारीत सहभागी झालेल्या महिलांना 15 तारखेपर्यंत अर्ज भरणे शक्य नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी सरकारने दिलेली मुदत व्यवहार्य नाही. ही योजना सर्वांसाठी खुली असावी. प्रत्येक महिलेला आपण तिचा अधिकार दिला पाहिजे. योजना फक्त निवडणुकीपुरती आणायची आणि नंतर बंद करायची, हे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले.
लाडकी बहीण योजनेत 21 वर्षांवरील अविवाहित महिलांना वगळण्यात आले आहे. त्यांचा दोष काय? एखाद्या महिलेने लग्न न करण्याचे ठरवले असेल, तर तिला ही मदत मिळणार नाही का? तसेच 60 वर्षांवरील महिलांना कुणी सांभाळणारे नसेल, तर त्यांनाही या योजनेतून वगळणे चुकीचे आहे. त्यामुळे सरकारने नोंदणीसाठीची अंतिम तारीख काढून टाकावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. नोंदणी केंद्राबाहेर दलालांकडून महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याची बाबही चव्हाण यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.