- चंद्रशेखर बावनकुळे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया
- समाजातील सर्वच घटकांना भरीव मदत, अनुदान व न्याय
मुंबई-महाराष्ट्राचा पोशिंदा असलेल्या माझ्या बळीराजाला आर्थिक व मानसिक ताकद देण्याच्या निर्धारासह वारकरी संप्रदाय, महिला, युवती, युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, विवाहिता, विधवा, दिव्यांग, वृद्ध, सैनिक, पोलीस, नोकरदार,उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना आजच्या अर्थसंकल्पातून भरीव मदत, अनुदान व न्याय देण्यात आला आहे, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात मांडला. त्यावर श्री बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याच्या विकासाची बीजे मजबूत करणारा तर आहेच, शिवाय संशोधन, आरोग्य, कृषी, आदिवासी याच्या विकासावर भर दिला आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अर्थ मंत्री व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
ते म्हणाले की, कृषीपंपावरील वीज बिल माफीची महत्वाकांक्षी घोषणा करून राज्यातील ४७ लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या माध्यमातून २१ ते ६० वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून माता भगिनींना वर्षाला ३ सिलिंडर देण्याचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण पाऊल आहे.
सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीजेसह सिंचन, जलयुक्त शिवार योजनेतून हिरवीगार शेती, नवे रोजगार, लघु उद्योगाला प्रोत्साहन, तीर्थक्षेत्र विकास, भरीव ऊर्जा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये हे सगळेच राज्याला गतिमान प्रगतीकडे वाटचाल करणारे आहे, असा विश्वास मला आहे.