मुंबई-अडीच वर्षे तुम्ही लाडका बेटा केला त्याचे काय? असा प्रति प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. आम्ही लाडका भाऊ योजना आणून दहा हजार रुपये लोकांना देत असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आम्ही सर्वसमावेशक म्हणतो त्यावेळी शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक, वारकरी या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ही अतिशय महत्त्वाची योजना असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना भेट जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्वयंपाकासाठी लागणारे गॅस महिलांना मिळावे यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे. त्यामुळे विरोधक गॅसवर आले असल्याचा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
आमचा संकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले होते. त्यांचे चेहरे उतरले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खोटे नरेरिटव्ह सेट केला होता. जनता त्यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला. ज्यांनी औरंगजेब आणि याकूब मेमन यांना बाप मानले, त्यांना चादरच दिसत असल्याचे म्हणत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना याच्यावर पलटवार केला आहे.
आमचे सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरील निर्बंध हटवण्यात आले आहे. जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्या आहेत. तसेच खासगी विकासाच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या असल्याचा दावा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना दहा हजार रुपये देणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लाडका भाऊ योजनेचा निर्णय देखील आम्ही घेतला असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला.
शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाच्या योजना राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत करण्याची घोषणा झाली आहे. दादा वाद्यासाठी पक्के आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांच्या कामाचे देखील कौतुक केले. आधी अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करून या योजना जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे योजना पूर्णपणे राबवल्या जाणार असल्याचे देखील ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे. मात्र, हा थापांचा नाही तर आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प असल्याचे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शेतकऱ्यांना मदत करणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवकांना रोजगार देणारा, अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विरोधी पक्षातील नेते या ठिकाणी बोलत होते, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता. त्यांचे चेहरे उतरलेले होते. ते केवळ टीका करत होते, असे म्हणत देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा देखील समाचार घेतला. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा एक नवा इतिहास लिहिणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बजेट सादर होण्यापूर्वीच जयंत पाटील यांची स्किप्ट तयार
या अर्थसंकल्पात आम्ही कबूल केलेली प्रत्येक गोष्ट त्या त्या निश्चित वेळेनुसार पूर्ण करून दाखवणार असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अतिशय उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी अजित पवार यांचे कौतुक करत आभार देखील मानले. आम्ही कसाही अर्थसंकल्प सादर केला असता तरी देखील अर्थसंकल्प सादर होण्याआधीच जयंत पाटील यांनी त्यांची स्क्रिप लिहून आणली होती. मात्र याविषयी प्रतिक्रिया देताना त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता. हा अत्यंत वास्तववादी अर्थसंकल्प असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला – अजित पवार
मी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तसेच दीपक केसरकर यांनी देखील सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे आम्ही यामध्ये नवीन नाही. गेली अनेक वर्षांपासून आम्ही राज्यकारभार पाहत आहोत. त्यामुळे आम्ही काही निर्णय घेतले तर त्याची अंमलबजावणी करण्याकरता तेवढी क्षमता राज्यामध्ये आहे का? तेवढा निधी आपल्याकडे आहे का? केंद्र सरकारने सर्व राज्यांना घालून दिलेली नियम असतात, त्यात सर्व बसते का? हे सर्व आम्ही पाहिले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
सर्वांचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर केला असल्याचा देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना वीज माफी देण्याची योजना ही अनेक दिवसांपासून आमच्या मनात होती. त्यामुळे या योजनेची घोषणा देखील या अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. एक पासून तर साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल माफ करण्याची घोषणा या योजनेमध्ये करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
या सर्व योजनांच्या माध्यमातून ज्यांना लाभ द्यायचा आहे, त्याचा पैसा इतर कोणाच्याही हातात जाणार नाही. तर थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जाणार आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता ठेवण्यात आली असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.