पुणे – फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पुण्याची ओळख आता ड्रग्ज व पब्जचे माहेरघर झाल्याची टीका त्यांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, ”गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे”, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले आहे की, ”अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
तसेच याप्रकरणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ”पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजप शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे”, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.