शरद पवार गटाने १० जागा लढवून ८ जिंकल्या. उद्धवसेनेेने २१ जागा लढवून ९ जिंकल्या. काँग्रेसने १७पैकी १३ जिंकल्या. उद्धवसेनेपेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट खूप जास्त अाहे. त्याचा प्राधान्याने विचार व्हावा हा मुद्दाही जागा वाटपात काँग्रेस, शरद पवार गट लावून धरणार आहे.
शरद पवार शुक्रवारी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत म्हणाले की, लोकसभेत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. पण मविआचे ऐक्य टिकून राहावे, यासाठी मी दोन पावले मागे आलो. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, याची तयारी ठेवा.असे वक्तव्य केल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चार पावले मागे घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे मानले जाते आहे
आगामी विधानसभेसाठी मविआत जागावाटपामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ असेल असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. मग शरद पवारांनी आम्ही लोकसभेप्रमाणे विधानसभेला कमी जागा घेणार नाही, असे सांगणे सुरू केले. दुसरीकडे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा भाऊ, छोटा भाऊ अशी भाषा चालणार नसल्याचा दावा केला. या वादाची गंभीर दखल काँग्रेसचे दिल्लीश्वर म्हणजे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतली. त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना केली. त्यानुसार मविआत प्रत्येक पक्षाला ९६ जागा द्याव्यात, असा फाॅर्म्युला तयार करण्यात आला आहे. शिवाय मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचाही चेहरा पुढे करण्याऐवजी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, असेही सूत्र जागावाटपाच्या वेळी निश्चित होणार आहे.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, लोकसभेप्रमाणे विधानसभेतील महायुतीला जोरदार धक्का द्या. मोठ्या फरकाने पराभूत करा, असा स्पष्ट निरोप राहुल गांधी, खरगेंनी दिला आहे. त्यामुळेच पटोले यांनी काँग्रेस १५० जागा लढवणार या वक्तव्याची पुनरावृत्ती केली नाही. लोकसभेला काही जागांसाठी मविआमध्ये शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. ती विधानसभेला होता कामा नये, याची काळजी शरद पवार घेणार आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप एकत्र लढत असताना शिवसेना किमान १५० जागा लढत होती. बदलती राजकीय परिस्थिती, एकनाथ शिंदेंना लोकसभेत मिळालेल्या जागा लक्षात घेऊन उद्धवसेनेला चार पावले मागे घेण्यास शरद पवार भाग पाडू शकतात. म्हणून त्यांना काँग्रेसकडून पूर्ण शक्ती दिली जाणार आहे.
काँग्रेसला खात्री : २०१९ च्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने ५६ जागा मिळवल्या होत्या. त्यातील ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. यामुळे मविआमधील जागावाटपात आपण चार पावले मागे आलो तरी काँग्रेस, शरद पवार गट आपल्या पुढे नाही, याचे समाधान उद्धव ठाकरेंना मिळेल. शिवाय त्यांचा भाजपचा टोकाचा विरोध आणि त्यांना दुसरा पर्याय शिल्लक नसल्याने ते थोडीफार टिकाटिप्पणी करून ९६ चा फाॅर्म्युला मान्य करतील, याची आम्हाला खात्री असल्याचे या काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे.