कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात किमान 10 भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यापैकी 5 जण केरळचे रहिवासी होते. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कुवेतच्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता हा अपघात झाला.पहाटे लागलेली आग संपूर्ण इमारतीत पसरली. अनेक लोक इमारतीत अडकले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मेजर जनरल ईद रशीद हमद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या इमारतीत अनेक स्थलांतरित मजूर राहतात.
कुवेतमधील घटनेबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्यही समोर आले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ते म्हणाले की, “कुवेतमध्ये झालेल्या अपघातामुळे मला धक्का बसला आहे. तेथे सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही तपशील बाहेर येण्याची वाट पाहत आहोत. भारतीय राजदूत घटनास्थळी रवाना झाले आहेत. ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो.”या घटनेनंतर कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. दूतावासाने पोस्ट केले आणि म्हटले- आज भारतीय कामगारांना झालेल्या दुःखद अपघातासंदर्भात एक आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. हा क्रमांक आहे- +965-65505246. संबंधित अपडेटसाठी या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधा. दूतावास तुम्हाला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे.
कुवेतमधील एका वरिष्ठ पोलीस कमांडरने सांगितले की, एकाच खोलीत अनेक लोक राहत होते. पैसे वाचवण्यासाठी हे कामगार असे करतात. कोणीही माहिती न देता इमारतीत राहू नये, यासाठी आम्ही वेळोवेळी सूचना देत असतो.
कुवेतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसूफ अल-सबाह यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, स्थावर मालमत्ताधारकांच्या लोभापोटी अशा घटना दुर्दैवाने घडतात. जास्त भाड्याच्या लालसेपोटी इमारतीचे मालक एकाच खोलीत अनेकांना बसवतात. यावेळी इमारतीची सुरक्षा व्यवस्था कोलमडते.
कुवेत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत 160 हून अधिक लोक राहत होते. या इमारतीत अनेक लोक बेकायदेशीरपणे राहत होते, त्यामुळे ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे कळू शकले नाही, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

