अन्यथा या देशद्रोह्याचा जनता करेल बंदोबस्त
पुणे- मानखुर्द विधानसभा मतदार संघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत तब्बल ८७,९७१ चे लीड दिल्याने ट्विटर वर आपले मत पोस्ट करताना किरीट सोमैय्या यांनी या परिसराला बांगला देशी परिसर असे संबोधले आहे , आम्ही बंगला देशी परिसरात हारलो असे म्हटले हा मोठा देश द्रोह असून त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा जनता त्यांचा बंदोबस्त करेल असे पुण्यातील शिवसेने चे अध्यक्ष संजय मोरे यांनी म्हटले आहे .
संजय मोरे यांनी या संदर्भात पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे त्यात म्हटले आहे कि,’ लोकसभा 2024 च्या झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई शहरातील ईशान्य मुंबई या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री संजय दिना पाटील सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील जनतेने दिलेल्या भरघोस मताने खासदार म्हणून निवडून आले. त्यासंदर्भात भाजपाचे नेते जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वेगवेगळ्या पद्धतीचे विधानं करीत आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे श्री किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेले विधान खालील प्रमाणे आहे.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-07-at-18.49.48-820x1024.jpeg)
“भाजप मिहीर कोटेचा ईशान्य मुंबई 29,861 मताने पराभूत. मानखुर्द मध्ये 87, 971 मताची तूट. मुलुंड ते घाटकोपर 58,110 मतांचा लीड. मानखुर्द विधानसभा (बांगलादेश परिसर) उद्धव ठाकरे सेना 1,16,072 मतं, तर भाजपला 28,101 मतं. आम्ही बंगलादेशी परिसरात हरलो, पराभूत झालो. !!”
या विधानाचा अर्थ असा होत आहे की मुंबई शहरातील हा भाग मुंबईचा नसून बांगलादेशचा आहे. असे त्यांनी त्यांच्या विधानामधे स्पष्ट उल्लेख केला आहे. सदर विधान देशाच्या अखंडतेला तडा देणारं आहे. देशाच्या अखंडतेवर बोलणे व त्यावर शंकास्पद विधान करणे हे देशद्रोह करण्यासारखे आहे. भारत देश हा अखंड आहे. मुंबईच काय तर देशातील कोणत्याही राज्याचा भाग हा शेजारील राष्ट्राचा होऊ शकत नाही. असे विधान करणे म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास करण्यासारखे आहे. त्या भागाला जर ते बंगलादेशी परिसर म्हणत असतील तर त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत ज्यामुळे ते हे सिद्ध करू शकतात ? याचीही चाचणी ATS अथवा NIA च्या मार्फत करणे क्रमप्राप्त आहे. कारण सदर व्यक्ती ही देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या विधानाची पडताळणी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांनी केलेल्या विधानाची त्यांच्याकडे चौकशी करण्यात यावी. तसेच मानखुर्द हा भाग महाराष्ट्रातील मुंबई या शहरातील आहे. त्याबद्दल असे विधान करणे हे त्या भागातील दलित व अल्पसंख्याक लोकांचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे सदरचा गुन्हा हा ॲट्रॉसिटी अंतर्गत येत असल्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करण्यात यावी.
तसेच किरीट सोमय्या यांनी मांडलेले मत हे पूर्णपणे चुकीचे आहे. सदर भागातील मतदार हे भारतातील नागरिक असल्यामुळेच त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यांना मतदानाचा अधिकार भारताच्या संविधानाने दिला आहे. ते भारताचे नागरिक आहेत. याची पूर्ण पडताळणी करूनच त्यांचे नाव मतदार यादीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत नोंदणीकृत केले आहे. त्यामुळे मतदान करणारे लोक हे बांगलादेशी परिसरातील आहे असे मत मांडणे म्हणजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारे आहे. यात कोणतीही शंका उपस्थित होत नाही. त्यामुळे सदरची तक्रार आपल्या मार्फत निवडणूक आयोगाला करण्यात यावी. अशी विनंती करीत आहोत. किरीट सोमय्यांनी ट्विटरवर मांडलेले मत हे अनेक लोकांनी पाहिले आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. मानखुर्द मध्ये राहणारे नागरिक एका विशिष्ट जाती व धर्मातील असल्यामुळेच भाजपमधील जबाबदार नेते किरीट सोमय्या त्यांच्या देश प्रेमाबद्दल व अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करणे हे भारताच्या राज्यघटनेतील अखंडतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यासारखे आहे.
सदर मतदारांच्या मूलभूत हक्काच्या रक्षणाची जबाबदारी ही संविधानाने पोलीस प्रशासनास दिली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राचा नागरिक असल्याकारणाने सदरच्या व्यक्तीने देशांमधील दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी व विशिष्ट जातीच्या लोकांना व धर्माच्या लोकांना कमी लेखण्याच्या हेतूनेच सदरचे विधान केले आहे. यात माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. म्हणून श्री किरीट सोमय्याच्या विरोधात मी शिवसेना पुणे शहराच्या वतीने आपणास तक्रार देत आहे. ही फिर्याद मानून गुन्हा दाखल करावा. आपण सदरच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील फौजदारी कारवाई करून व देशाच्या संविधानातील अखंडतेचे व समतेचे रक्षण कराल, याची आम्हाला खात्री आहे. अन्यथा शिवसेना पुणे शहराच्या वतीने देशांमध्ये अखंडता व समतेवर घाला घालणाऱ्या नेत्यांचा बंदोबस्त शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असे संजय मोरे यांनी म्हटले आहे.