पुणे:
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘कथा कीर्तन महोत्सव’ च्या समारोप प्रसंगी रविवार,दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे ‘महाभारतातील किर्तन परंपरा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नागलक्ष्मी राव, भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर झाले.कीर्तन महोत्सवानिमित्त भारतीय विद्या भवन आवारात चित्रकला व शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात अकरा कलाकार सहभागी झाले .
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी चांगला प्रतिसाद दिला.
लीना मेहेंदळे म्हणाल्या,’सृष्टी वरील जीवन सुविहित सुरू राहावे यासाठी वेद मार्गदर्शन करतात. समाधी अवस्थे पर्यंत बुद्धीला नेवू शकलो तर प्रज्ञा प्राप्ती होते. त्यासाठी निर्गुण उपासना सुरू ठेवली पाहिजे.
उपास्य देवतेचे नाम संकीर्तन केल्याने योग क्षेम होतो तसेच ज्ञान मिळते. प्रल्हाद, नारद, अंबरीश अशी मोठी भक्त परंपरा दिसून येते. भक्ती करताना आपण देवतेचे गुण देखील घेतले पाहिजेत. भक्तीमय, प्रेममय होणे हाच भक्तिचा लाभ आहे,असेही त्यांनी सांगितले.

