मुंबई–मी 15 दिवसांत दिल्लीत वरिष्ठांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असे एकनाथ खडसेंनी स्वतः सांगताना आपल्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आतापण कोणावरही नाराज नाही उलट मीच ४२ वर्षाच्या पक्षाशी असलेल्या लगावामुळे नाराज होतो आता ती नाराजीची तीव्रता उरलेली नाही असे स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसे यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना हा खुलासा केला. खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मी कायमच ऋणी राहिल. शरद पवारांनी आपल्याला संकट काळात मदत केली. त्यामुळे त्यांना विसरणे अशक्य आहे. परंतु मला माझ्या मुळ पक्षात असले पाहिजे, अशी साद अनेक ज्येष्ठ नेत्यांनी घातली होती. त्यानंतर मी विचार करून हा निर्णय घेतला आहे.
भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 15 दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याच दिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.जुन्या कार्यकर्त्यांनी विनंती केली.एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. पण भाजपमध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे. तुम्ही परत आले तर बरं होईल, अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांमध्ये नेहमी होत असे. हे काय आजचं नव्हतं. चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरु होती, असेही खडसे म्हणाले.भाजपच्या जडणघडणीत माझा सहभाग
भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीमध्ये माझे योगदान राहीलं आहे. गेले अनेक वर्ष मी या घरामध्ये राहिलो आहे. चाळीस-बेचाळीस वर्ष ज्या भाजपमध्ये मी राहिलो त्यामुळे माझा लगाव जाण्याचा होता. काही कारणासाठी माझी नाराजी झाली. त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडलो होतो. माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी माझ्या पक्षात जाण्याचा पुन्हा विचार करतोय, असेही एकनाथ खडसे म्हणाले. खडसे म्हणाले की, माझ्या पक्षप्रवेशाने कोणाचीही नाराजी नाही मी सर्वांना घेऊन चालणारा आहे. माझ्याविषयी कोणाची नाराजी असेल तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. माझी नाराजी कमी झाली. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.माझ्यावर कोणताही दबाव नाही
एकनाथ खडसे म्हणाले की, मला तुरुंगात टाकण्याचा कुठलाही धाक माझ्या मनात नव्हता. मी जामीनावर आहे. त्यामुळे मला पर्मनंट जामीन मिळाला आहे. त्यामुळे केस चालत राहील आणि मला कोणी उठून जेलमध्ये टाकेल, अशी देखील परिस्थिती आज तरी नाही. मी या संदर्भात निश्चित आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.