श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा : बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना यंदाचा श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कारपालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखीचे पुण्यात आगमन होत असून बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मंडईमधील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त ३ मार्च पर्यंत महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपाली भुजबळ यांच्या हस्ते पालखी पादुका पूजन आणि आरती होऊन मिरवणूकीस प्रारंभ होईल. पालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.
यंदाचा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि. 3 मार्च रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, दिनांक २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हर्षद कुलकर्णी हे ‘स्वामी भक्ती गीते’ सादर करणार आहेत. तसेच शुक्रवार, दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांचे सादरीकरण होणार आहे, तर २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मुकुंद बादरायणी हे ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवार दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता योगेश तपस्वी आणि सहकारी ‘स्वामीगीत सुगंध’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यानंतर महिलांच्या हस्ते महाआरती होणार आहे. उत्सवात सर्व दिवस रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

