नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, भारतात ६.३ कोटी इतके सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. त्यांपैकी सुमारे २० टक्के उद्योग महिलांच्या मालकीचे आहेत आणि त्यांतून सुमारे २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार मिळतो. एका अंदाजानुसार, महिलांच्या उद्योजकतेला गती दिल्यास, भारतात महिलांच्या मालकीचे आणखी तीन कोटींहून अधिक उद्योग निर्माण होऊ शकतात आणि त्यांमधून सुमारे १५ ते १७ कोटी जणांना नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
~ ईशान्येकडील राज्ये, राजस्थान, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत १.० साठी महिला नवउद्योजक’ हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू ~
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : ‘पिलानी इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सोसायटी‘ या ‘बिट्स पिलानी‘च्या ‘टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर‘ने महिला उद्योजक मंचाच्या (विमेन एंटरप्रेन्योर प्लॅटफॉर्मच्या – डब्ल्यूईपी) संयुक्त विद्यमाने ‘वुमनप्रेन्योर फॉर भारत १.०‘ (भारत १.० साठी महिला नवउद्योजक)हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम नीती आयोगाशी संबंधित आहे आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या सीएसआर विभागाने याकरीता सहकार्य केले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी धोरणात्मक दिशा ठरविणारी आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन ही सर्वोच्च संस्था आहे. राजश्री बिर्ला या फाउंडेशनच्या मार्गदर्शक आहेत, तसेच विशाखा मुळ्ये, डॉ. प्रज्ञा राम आणि सुभ्रो भादुरी हे फाउंडेशनचे संचालक आहेत.
अरुणाचल प्रदेशातील इटानगरमधील ‘दोरजी खांडू स्टेट कन्व्हेन्शन सेंटर‘ येथे २४ नोव्हेंबर रोजी ‘उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखाली विकास साधणे‘ या विषयावर राज्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. ही कार्यशाळा नीती आयोगाच्या राज्यांना मदत या अभियानाच्या अंतर्गत आणि अरुणाचल प्रदेश सरकार व महिला उद्योजक मंच यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती. विविध व्यवसाय, सरकार आणि नागरी समाजामध्ये नवकल्पना, उद्योजकता आणि सर्वसमावेशक विकास यांच्या परिसंस्था एकत्र आणून महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेद्वारे विकास साधणे या विषयावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
ईशान्येकडील राज्ये, राजस्थान, हरयाणा आणि जम्मू-काश्मीर या प्रदेशांतील मध्यम व लहान शहरांसाठी काम करणाऱ्या किंवा खुद्द तेथील स्थानिक महिला उद्योजकांना निधी आणि इतर मदत पुरविणे हे ‘वुमनप्रेन्योर फॉर भारत १.०‘ या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. ‘यूएन-एसडीजी‘ क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि त्या प्रदेशांतील व्यावसायिक वा सामाजिक आव्हाने सोडविणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाखालील नफा कमावणाऱ्या व ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना या उपकमाचा लाभ मिळू शकेल.
या घोषणेविषयी अधिक माहिती देताना ‘आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन‘च्या संचालिका व ‘आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड‘च्या सीईओ विशाखा मुळ्ये म्हणाल्या, “आम्ही देशासाठी समान, सर्वसमावेशक व दीर्घकालीन अशी सामाजिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘वुमनप्रेन्योर्स फॉर भारत १.०‘ या उपक्रमाच्या माध्यमातून, देशातील महिला उद्योजकांच्या प्रगतीला चालना देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. संधी मिळत नसलेल्या प्रदेशांतील भारतीयांना नाविन्यपूर्ण उपायांद्वारे सेवा पुरविण्याची क्षमता बाळगणाऱ्या उद्योजकांसाठी हा उपक्रम आहे.”
‘बिट्स पिलानी‘चे कुलगुरु प्रा. व्ही. रामगोपाल राव म्हणाले, “भारताच्या कानाकोपऱ्यातील विविधांगी लोकसंख्येला स्थानिक उद्योजकांकडून स्थानिक उपाय पुरविले जाण्याची आवश्यकता आहे. मला ठाम विश्वास आहे की नवकल्पनांच्या पुढच्या लाटेचे नेतृत्व महिला नवउद्योजिका, विशेषत: ईशान्येकडील राज्यांत राहणाऱ्या नवउद्योजिका करतील आणि त्या प्रदेशातील असाधारण स्वरुपाच्या समस्या त्याच सोडवतील. यातील काही नवकल्पना समाजासमोर आणण्यात आणि त्यांना वाढीसाठी मदत करण्यात महिला उद्योजक मंच आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”
या घडामोडींविषयी बोलताना ‘डब्ल्यूईपी‘च्या मोहीम संचालिका अॅना रॉय म्हणाल्या, “टेक-फॉर-गुड क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प धोरणात्मक स्वरुपाचा आहे. उत्तम बाजारपेठ असलेल्या, प्रभाव पाडण्याची क्षमता असणाऱ्या, लैंगिक समानतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी अनुरुप आणि महिलांच्या माध्यमातून विकास होणाऱ्या डिजिटल स्वरुपाच्या तांत्रिक क्षेत्राशी संबंधित हा प्रकल्प आहे. विशेष विकास क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून नवकल्पनांचे नेतृत्व करणाऱ्या महिला उद्योजिका या उद्योग आणि समाज या दोन्हींसाठी लक्षणीय लाभ मिळवून देऊ शकतात, हे सिद्ध झालेले आहे.“
या उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या स्टार्ट-अप्सना १० लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर ‘पीआयईडीएस‘कडून ‘इन्क्युबेशन‘साठी सहकार्य, एकास एक स्वरुपाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, बाजारपेठ मिळविण्यासाठीची मदत आणि भविष्यात गुंतवणूक वाढवण्याच्या संधी, असे साह्यही या स्टार्टअप्सना दिले जाणार आहे. यामध्ये स्वारस्य असलेल्या नवोन्मेषक महिलांनी पुढील वेबसाईटवर अर्ज करावेत : https://www.f6s.com/womenpreneurs-for-bharat-1.0/apply