पुणे : “शरीर व मनाची शक्ती सदासचेतन ठेवण्यासाठी साधना महत्वाची आहे. समतोल आहार, योग्य व्यायाम व ध्यानधारणा, स्वतःच्या शरीरसंपत्तीचे रक्षण करत मन आणि मेंदूचा विकास झाला, तर निरोगी व आनंदी जीवनाचा मार्ग सापडतो. त्यातून आपले जीवन अधिक सुंदर होते. आपल्या जगण्याचे नेमके ध्येय काय, याचा शोध आपण घेतला पाहिजे,” असे प्रतिपादन पूज्य आचार्य परम आलय जी यांनी केले.
सन टू ह्युमन फाउंडेशनच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन येथे सहा दिवसीय ‘नए दृष्टीकोन वाला शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हजारो पुणेकरांनी सहभाग घेत गुरुजींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या शिबिराच्या समारोपाप्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पूज्य परम आलय यांना ‘दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ प्रदान करण्यात आला. प्राचीन संस्कृती आणि आधुनिक शास्त्राचा मेळ घालत समाजपरिवर्तन, मनःशक्तीचा प्रसार करण्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी परम आलाय गुरुजींचा सन्मान करत त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रसंगी माँ मैत्रेयी, उद्योजक राजकुमार सांकला, रमेश गांधी, साधक तारिणी दीदी आदी उपस्थित होते.
परम आलय जी म्हणाले, “सूर्यकिरणे, पृथ्वीची प्रदक्षिणा, सौरमंडळात होणारे विविध बदल आपल्या जीवनाला दिशा व ऊर्जा देणारे आहेत. आपल्या नाश्त्यात, जेवणात स्वयंशिस्त असायला हवी. मुलाच्या बालपणापासूनच आपण त्यांना ऐहिक सुखाचें शिक्षण देतो व भरमसाठ संपत्ती गोळा करतो. हा हव्यास कशासाठी, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. सुविधा आणि साधना यातला फरक समजून घ्यायला हवा. मन आणि मेंदू यांच्यातील संबंध उलगडून दोन्हीचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी साधना करणे गरजेचे आहे. तणाव, दडपण, चिडचिड, भय, कामवासना, क्रोध, शारीरिक व्याधी, झोपमोड, विचारमग्नता यापासून सुरू राहण्यास साधना उपयोगी ठरते.”
माँ मैत्रेयी म्हणाल्या, “भगवान कृष्ण, ऋषी पतंजली यांनी जीवनाचे मूलाधार सूत्र दिले आहे. मात्र, आपण भौतिक सुखांच्या मागे लागून जीवनाचा मूळ उद्देश विसरलो आहोत. आपण केवळ पैसे कमवण्याच्या मागे लागलो असून, स्वतःच्या शरीरसंपत्तीचा विसर पडला आहे. संसाराच्या गाड्यात इतके बुडत चाललोय की, आपल्याला स्वतःसाठी जगायला वेळ नाही. बदलती व चुकीची जीवनशैली अंगीकारल्याने देहरूपी संपत्तीला अनेक आजार, व्याधी व समस्यांनी ग्रासले आहे. यातून सुटका करून व्याधीमुक्त, आनंदी जीवन जगण्यासाठी स्वतःला वेळ देण्यासह ऊर्जादायी आहार घेण्याची गरज आहे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी परम आलयजी यांनी दिली आहे. त्यांच्या शिबीरात सहभागी झाल्यापासून माझ्या शारीरिक व मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला आहे. ‘सूर्यदत्त’ यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षांत ‘सूर्यदत्त’ने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे, सकारात्मक जीवनाचे शिक्षण दिले आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासह जीवनमूल्यांचे, परिवर्तनाचे शिक्षण देण्याची दिशा मिळाली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया न घालवता, त्यांना त्यांचा आत्मपरिचय करून देत त्यांचे शरीर व मन चांगल्या रीतीने विकसित करण्यासाठी विविध प्रकारची सत्रे आयोजिली जाणार आहेत.”
“गुरुजींचे मार्गदर्शन हे प्रवचन नव्हे, तर प्रयोगातून सिद्ध केलेला विचार आहे. व्यवहार्य मार्गात शारीरिक आणि मानसिक समस्यांवर मात देण्यासाठी काय काय करावे, यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरले. निवासी शिबिरात स्वतः सहभागी होणार असून, इतरांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. सत्रानंतर दिलेल्या साध्या आरोग्यदायी अल्पोपहारातून शरीराला आवश्यक प्रथिने, कर्बोदके, ऊर्जा आदी घटक मिळतात. प्रेम व आनंदमय वातावरणात झालेल्या या शिबिरातून जीवनाला सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना घडवताना कोणत्या गोष्टी कराव्यात, याचाही मार्ग सापडला आहे. त्यासाठी सन टू ह्युमन फाउंडेशनसोबत सामंजस्य करण्यात आला आहे. ५० मुलांना घेऊन गुरुजींच्या आश्रमात निवासी शिबिरासाठी जाणार आहोत,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.————————–आजवरचे ‘दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’
यापूर्वी ‘दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ हा पुरस्कार राजयोगिनी दीदी जानकीजी, राजयोगिनी दिदी हरिदया मोहिनीजी, स्वामी दयानंद सरस्वतीजी, परमपूज्य श्री ऋषीप्रभाकर गुरुजी, योगगुरू डॉ. बीकेएस अय्यंगार, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सद्गुरू जगदीश वासुदेवजी, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी, योगगुरू बाबा रामदेव, पूज्य गुरूदेव श्री राकेश भाई, गुरुदेव श्री नयपरमसागरजी महाराज, ब्रह्मर्षी गुरुवानंद स्वामीजी, सुधांशु महाराज जी, परमपूज्य डॉ. विष्णू महाराज पारनेरकरजी, स्वामी चिदानंद सरस्वतीजी, पूज्य आचार्य चंदना जी माँ, आचार्य स्वामी श्री शिव मुनीजी, सुंदरलाल बहुगुणा, डॉ. मोहन धारियाजी, मधू पंडित दासजी, बाबा आमटे, शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सत्यवृत शास्त्री, गुरुजी ज्ञानवत्सल स्वामीजी यांना प्रदान करण्यात आला आहे.

