पुणे-पुण्याला निसर्गाचं ,पाण्याचं,ऐतिहासिक सौख्य तर लाभलं होतच. पण आता त्यावर हल्ले करण्याचं काम वर्षानुवर्षे काही लबाड अधिकाऱ्यांच्या मदतीने अजूनही सुरूच आहे. बिबवेवाडी वानवडी रस्त्यावरील गंगाधाम चौकाच्या अलीकडील झाला कॉम्प्लेक्स ला खेटून असलेले हे उत्खनन पहा … अंदाजे हि १० एकर जागा असू शकेल या ठिकाणी असलेल्या डोंगर भुइसपाट करण्याचे काम रात्रंदिवस येथे सुरु आहे कित्येक झाडे तोडली गेलीत , जी महापालिकेच्या दप्तरी क्रमांक टाकून नोंदविली गेली होती . जिथे डोंगरच्या डोंगर बिल्डर लॉबी लबाड अधिकाऱ्यांच्या मदतीने इकडून तिकडे फेकून देते तिथे , या झाडांच्या नोंदीची पाने महापालिकेच्या दप्तरातून फाडली जाणे काही अवघड अजिबात नाही . प्रश्न एवढाच आहे … जिल्हाधिकारी डोंगरे , टेकड्या ,नदी नाले सुरक्षित ठेवायला असताना ते नेमके या विरोधात कधीपर्यंत काम करणार आहे आणि त्यांना साथ महापालिकेचे अधिकारी कधीपर्यंत देणार आहेत? आता पुण्याचं वाटोळं तुम्ही करणार तरी कुठवर हे एकदाच,. सांगून टाका असा सवाल त्यांना करावा लागणार आहे .
डोंगर , टेकड्या फोडून झाडी तोडून नाले, नद्या बुजवून पुण्याचं वाट्टोळं केलं गेलं हे शेंबडे पोरं हि सांगतील . आणि यामुळे पुण्यातील उष्मा वाढला ,पावसावर परिणाम झाला, वाहतुकीच्या कोंडीचे ग्रीनीज बुकात नोंद व्हावी असे शहर हे बनलेय. एकेकाळी शांत , सायकलींचे , पेन्शनरांचे पुणे कॉंक्रीटच्या जंगलाने, वाढलेल्या घरांच्या किंमतीने नशेच्या आहारी गेले,शिक्षणाचे माहेरघर , गुन्हेगारीचे माहेरघर बनले आणि याला जबाबदार कोण असेल हे आता जानेतेनच ठरवावे . केवळ समाज जबाबदार नाही , उघड्या डोळ्याने बेकायदा प्रकार पाहून मूक बनून राहिलेला समाज आणि त्याहून याची अधिक जबाबदारी ज्या आय ए एस लॉबी वर होती ती ..म्हणजे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर होती आणि आहे. समाजाला दहशतीच्या जोरावर , भीतीच्या आश्रयाखाली मूक बनवले गेले ते हे जिल्हाधिकारी अशा बेकायदा गोष्टीना बल देतात म्हणूनच . महापालिकेचे आयुक्त आणि बांधकाम विभागातील अधिकारी देखील हे सारे उघड्या डोळ्याने पाहतात आणि चिडीचूप बसतात हे त्याहून अधिक नवल …
या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजून पुण्याचं वाट्टोळं तरी किरी करायचं ठरवलंय हे खुद्द परमेश्वरालाही माहिती नसावं , कारण हजारो कोटींच्या कमाईची यांची तहान काही भागलेली अजूनही दिसत नाहीये .
कात्रज , धनकवडी , औंध , पाषाण , हडपसर खडकवासला ,कोथरूड अशा शहराच्या चारही बाजूने प्रचंड टेकड्यांची वाताहत लावली गेली असताना , लक्षावधीक, कोट्यावधी वृक्षांची कत्तल केलेली असताना अजूनही या शहरात टेकड्या , डोंगरांची खुले आम तोडफोड जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने होते आहे. नाले बुजवून , टेकड्या फोडून फोडून जमिनीचे सपाटीकरण करून प्लॉट करायचे आणि त्यावर गगनचुंबी इमारती उभ्या करून हजारो कोटींची कमाई करायची हा धंदा .अर्थात गैर धंदा प्रतिष्ठेने पुण्यात अव्याहतपणे सुरु आहे. त्याचे हे उदाहरण आहे. जिल्हाधिकारी , महापालिका यांना हे कसे दिसत नाही .. तक्रारी करूनही त्या दाबण्यात त्यांना यश कसे येते /या साठी कदाचित कोणतेही सरकार चौकशी लावणार नाही , अन पुणेकरही उघड्या डोळ्याने हे पर्यावरणाचा घात पाहून .. कुठवर गप्प बसणार आहेत देव जाणो ….
—- माय मराठी डॉट नेट साठी वरिष्ठ पत्रकार शरद लोणकर आणि कॅमेरामन अभिषेक लोणकर

