पुणे-कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 11 प्रवाशी ठार झाले असून, 2 जण गंभीर जखमी झालेत. मृतांत 3 महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते.यासंबंधीच्या माहितीनुसार, कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 11 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले. या घटनेत इतर 2 जणही गंभीर जखमी झालेत. त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांत 8 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील गोविली गावालगतच्या रायता पुलावर सकाळी 10.45 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती आज सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 11 ते 12 जण प्रवास करत होते. या कारला समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. त्यात कारमधील एकाही व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळणार नाही. ट्रकच्या धडकेने कारमधील 8 जण जागीच ठार झाले, तर इतर 1 जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी लगतच्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली.
या भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या 6 जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे कल्याण – नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरुळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्वच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत, असे ते म्हणालेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अपघाताबाबत निवेदन जारी करताना म्हणाले की, आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10:45 वाजण्याच्या सुमारास कल्याण – मुरबाड – माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, ही विनंती.
————————————————————————————————————————



