समाधान शिबाराचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे उद्घाटन

Date:

‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शासनाचे नागरिकांच्या कल्याणाकरिता लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय

पुणे, दि.१३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-२०४७’ करण्याच्या संकल्प करण्यात आलेला आहे; ‘विकसित महाराष्ट्राच्या’ माध्यमातून या संकल्पपुर्तीच्यादृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. त्याअनुषंगाने राज्यशासनाच्यावतीने लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित समाधान शिबारात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासन होते, या त्रिसुत्रीची प्रेरणा घेऊन अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर असे नाव दिले आहे. या शिबीरात जवळपास २० गावांचा यामध्ये समावेश आहे. वेगवेगळ्या विभागाच्या ४५ सेवा उपलब्ध करुन देण्यात आहेत, येत्या काळात सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे शिबीराचे आयोजन करावे.

या शिबाराच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० संगणकीकृत सातबाऱ्याचे वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप, २ हजार कमी जास्त पत्रक तयार केले, ५०० गावातील दस्तावेज दुरुस्ती करण्यात आले आहे, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्याचे वितरण करण्यात आले. एकूणच सुमारे ५ लाख परिवाराला शिबाराचा लाभ देण्यात आला असून खऱ्या अर्थाने मागील दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं काम राज्य शासनाच्यावतीने केले आहे.

नागरिकांच्या जीवनात महसूल आणि गृहखात्याचे महत्वाचे आहेत, त्यादृष्टीने इतरखातेही पुढे नेण्याचे काम सुरु आहे. २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अधिकाराचे विकेंद्रीकरण करून राज्यातील एकही नागरिक बेघर राहणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. बाजार मूल्य भावामध्ये वाढ न करण्याचा निर्णय, खासगी सर्व्हरची नेमणूक, भुमि अभिलेख अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समोवश, शेतजमीन अकृषक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. महसूल विभागातील पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात आला. महसूल विभागाला बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने महसूल विभाग, नोंदणी व मुंद्राक विभाग आणि भुमि अभिलेख विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता हवेली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेगळी ग्रामसभा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले. हा निर्णय राज्यात लागू करुन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा लागू करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्व शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे.

येत्या काळात ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरात लवकर बैठक घेवून सूचना देण्यात येईल. भामा-आसखेडसंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली शेरे कमी करण्याबाबत लवकरच पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल. देवस्थानाच्या नावे असलेल्या इनाम जमिनीबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येईल. हवेली तालुक्यातील लोणीकंदला स्वामित्व योजनेत आणून भूमिअभिलेख विभागाच्यावतीने ड्रोन सर्वेक्षण करण्यात करावे आणि मालमत्ता पत्रक आणि सनद देण्यात यावे. याकरीता खासगी सर्व्हर तातडीने नेमणूक करुन गतीने मोजणी करावी. लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, याप्रस्ताव जमीन देण्यात येईल.

ग्रामपंचायतीने लोकोपयोगी कामांबाबत महसूल विभागाकडे सादर करावे, त्यासही मंजुरी देण्यात येईल. कार्यक्रमात मागणी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन अडीअडचणी सोडविण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. याप्रमाणे अशा प्रकारची योजनांची पुणे विभागात अंमलबजावणी करण्याची विभागीय आयुक्तांना मंत्री श्री. बावनकुळे यांनी सूचना केली.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखले जाते. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित विभागाना सोबत घेवून नागरिकांना दिलासा देण्याचे कामे करण्यात येते. नागरिकांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतची सर्व प्रकारचे दस्ताऐवज महसूल विभागाशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुखकर व्हावे, त्यांना जलदगतीने सेवा देण्याकरिता गेल्या काळात विभागाच्यावतीने विविध क्रांतीकारी आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासह योजनांची माहिती होण्यासाठी अशा प्रकारचे शिबीरे उपयुक्त आहेत. जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनःरीक्षण कार्यक्रम, भारतीय जनगणना-२०२६, शेतकरी ओळखपत्र काढण्याच्या कामात नागरिकांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पुलकुंडवार यांनी केले.

श्री. राऊत यांनी महाराजस्व अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल विभागाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.

श्री. कंद म्हणाले, हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनांची कामे प्रगतीपथावर आहे. ही योजना यशस्वी करयाकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून जोमाने कामे करण्यात येत आहे.महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांबाबत समाधान व्यक्त करत येत्या काळात तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी मार्गी लावण्याची सूचनाही श्री. कंद यांनी केल्या.

श्री. साकोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

श्री. माने यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबीरात हवेली उप विभागात देण्यात आलेल्या लाभाबाबत माहिती दिली. नियमित कामे करण्यात महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काळातही यापुढेही अशाच प्रकारचे कामे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असेही श्री. माने म्हणाले.

कार्यक्रमात महसूल विभागाचा आकृतिबंध मंजूर केल्याबद्दल मंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बावनकुळे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरुपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महसुली सेवांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉल भेट देवून माहिती घेतली.

श्री. बावनकुळे यांच्या हस्ते विविध विभागाच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे...

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद...