पुणे: सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्ष) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरूड येथील निवासस्थानी महात्मा फुले यांना अभिवादन केले. महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणात नाही, तर कृतीत आणणे आपली सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ते म्हणाले की, “महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली आणि समतेचा विचार समाजात रुजवला. त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.”
या कार्यक्रमात केवळ राजकीय पदाधिकारीच नव्हे, तर कोथरूडमधील सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती, आ. योगेश टिळेकर, भाजपचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विकास लवटे, माजी शहराध्यक्ष नामदेव माळवदे, रिपाइंचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह अनेक दिग्गज विविध पक्षांचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होऊन महात्मा फुलेंना अभिवादन केले. त्यामुळे हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारांची उजळणी करणारा एक ऊर्जादायी उत्सव ठरला.

