पुणे- येथील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम येथील ‘मनशील अॅकॅडमी’ या खाजगी कोचिंग क्लास मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी विकास दिलीप गायकवाड (वय ३०) या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मात्र, अॅकॅडमीच्या मालकांवर किंवा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल न झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास गायकवाड हा गेल्या तीन महिन्यांपासून पीडित विद्यार्थ्याचे शारीरिक शोषण करत होता. शिकवणी वर्गाच्या परिसरातच हा सर्व किळसवाणा प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी केवळ अश्लील चाळे करून थांबला नाही, तर त्याने या सर्व कृत्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले होते. या व्हिडिओचा वापर करून आरोपी पीडित मुलाला ब्लॅकमेल करत होता का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
बाल हक्क कार्यकर्त्यांच्या मते, अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. जर मुलाच्या वागण्यात अचानक बदल झाला, तो एखाद्या ठिकाणी जाण्यास घाबरत असेल किंवा चिडचिडा झाला असेल, तर त्याच्याशी संवाद साधावा. तसेच, क्लासेसमध्ये प्रवेश घेताना तिथल्या सुरक्षिततेची आणि सीसीटीव्ही कव्हरेजची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
मनशील अकॅडमी’ मधील ही घटना संपूर्ण पुणे शहरासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी एक काळा डाग आहे. आरोपीला अटक झाली असली, तरी जोपर्यंत संस्थाचालकांची जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणात पारदर्शक तपास करून पीडित मुलाला न्याय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालक आपल्या पोटाला चिमटा काढून हजारो हजारो रुपये फी भरून त्यांना खासगी शिकवणी वर्गांना पाठवतात. मात्र, ज्यांच्याकडे विश्वासाने पाल्याला सोपवले जाते, तिथेच जर आपली मुले सुरक्षित नसतील, पालकांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण होतो.
सध्या आरोपी विकास गायकवाड पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यातील व्हिडिओ क्लिप्स आणि चॅटिंगची तपासणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात संस्थेच्या मालकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडित मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून केवळ कर्मचाऱ्यावरच नाही, तर ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले, त्या संस्थेवरही कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी ‘मनशील अकॅडमी’ गाठून तिथल्या संचालकांना जाब विचारला. मुलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा संस्थांच्या निष्काळजीपणामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढते, असा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी तातडीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी विकास गायकवाडला बेड्या ठोकल्या.
मात्र, या प्रकरणात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा प्रकार घडला, त्या अकॅडमी’च्या व्यवस्थापनाने सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही यंत्रणा असूनही तीन महिने हा प्रकार कोणाच्या लक्षात कसा आला नाही? संस्थेच्या संचालकांवर हलगर्जीपणा गुन्हा का दाखल झाला नाही? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यावर नकार दिला.
पीडित मुलगा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होता. तो अचानक शिकवणीला आणि शाळेला जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. जो मुलगा अभ्यासात हुशार होता, तो अचानक गप्प राहू लागल्याने पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पालकांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने आपल्यावर ओढवलेला हा भयंकर प्रसंग सांगितला. मुलाने सांगितलेली हकीकत ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने खासगी क्लासेससाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे, कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करणे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे अनिवार्य आहे. मात्र, ‘मनशील अकॅडमी’मध्ये या नियमांचे पालन झाले होते का? जर कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर व्यवस्थापनाचे नियंत्रण कुठे होते? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी विविध परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात. गंगाधाम आणि मार्केट यार्ड परिसर हा अशा शिकवणी वर्गांसाठी ओळखला जातो. मात्र, ‘मनशील अकॅडमी’मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “आम्ही लाखोंची फी भरतो ती केवळ शिक्षणासाठी नाही, तर आमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठीही. जर क्लासमध्येच मुले सुरक्षित नसतील, तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा?” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत .

