पुणे- भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या आधिपत्याखाली सहयोगी उपक्रम ’द इक्वाइन कलेक्टिव्ह’यांच्या तर्फे देशातील अश्व उद्योगाचे भविष्य घडविण्यासाठी समर्पित अशा पहिल्या राष्ट्रीय द इक्वेस्ट्रियन फोरम परिषदेचे आयोजन ११ व १२ एप्रिल रोजी पुण्यातील हॉटेल ह्यात येथे करण्यात येणार आहे. . या अश्व रोहण मंचाचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व पशुसंवर्धन आणि दुग्व्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक कु.गायत्री राहुल कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नॅशनल हॉर्स ब्रिडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.एफ.एफ वाडिया, पुण्याच्या जपलुप्पे इक्वेस्ट्रीयनचे सह संस्थापक श्री. रोहन मोरे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सीआयएपीचे सहसंचालक प्रा. रविशंकर साहू हे उपस्थित होते.
या अश्वरोहण मंचाला पुनावाला स्टड फार्म्स यांच्या सहकार्याने नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉ. एफ. एफ. वाडिया यांचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमात भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या मध्ये डॉ. हसनेन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाईर, डॉ. रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरनय, जुट्टा पुटझ आणि उत्पल एस. टाटू यांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी होणार्या पॅनल चर्चेमध्ये दोन मंत्री, कोलकता येथील जेष्ठ पत्रकार आणि अश्वरोहण खेळ व घोड्याच्या शर्यर्तीवरील लेखक सायरस जे मदन, ज्येष्ठ उद्योजक व पशुवैद्य डॉ. रवी रेड्डी यांच्यासारख्यातज्ज्ञ दिग्गजांची विविध सत्रे होतील. यामध्ये भारतीय अश्व परिस्थितीवरील धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर आणि हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ.नितीन विरमानी हे रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर बोलतील. त्याच प्रमाणे केंटकी इक्वाइन रिसर्चचे डॉ. पीटर हंटिग्टन ऑस्ट्रेलियाहून तरुण घोडे आणि कामगिरी करणार्या घोड्यांसाठी आहार धोरणे या विषयावर बोलण्यासाठी सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया मार्क बर्नेल हे मूल्य मानांकन या विषयावर बोलतील.
ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष के. आर. गजेंद्र पाल सिंगजी पोसाना ’देशी घोड्यांचा पुनर्वापर’ या विषयावर प्रकाश टाकतील. तंत्रज्ञान अवलंबन या संकल्पनेअंतर्गत जपालूप इक्वेस्ट्रियन सेंटर, पुणे येथील श्री. रोहन मोरे, द बार्न हाऊस, पुणे येथील श्री. रणजीत खेर आणि वायू टेक्नॉलॉजीज, पुणे येथील टीम यांची तीन सादरीकरणे होतील.
चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिंधू, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, यूके येथील श्री. ध्रुवपाल सिंग आंचन, वलसाड, गुजरात येथील यशस्वी ऑलिम्पियन अश्वारोहक श्री. इम्तियाज अनीस, यूके येथील अश्व प्रशिक्षक डॉ. डेव्हिड शीरीन, यूके येथील प्रतिष्ठित पशुवैद्य डॉ. डेसमंड लीडॉन हे पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योग क्षेत्राचे स्वरूप या विषयांवर बोलतील. जेपी ब्रँड्स, यूएसए येथील सुश्री जुट्टा पुट्झ या विस्तारक्षम अश्व व्यवसाय उभारण्यावर बोलतील.
१२ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पसमध्ये दिवसाची सुरुवात घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकाने (उपयोजित शिक्षण / सादरीकरण) होईल. त्यानंतर फ्रान्सच्या सुश्री मॉड चॅटेल यांचे फिजिओथेरपीचे थेट प्रात्यक्षिक सत्र होईल. युकेचे श्री. बर्नार्ड डुव्हरने हे घोड्यांच्या नाल कामावर (फॅरिअरी) आणखी एक थेट प्रात्यक्षिक सादर करतील. तसेच, या वेळी खालील विषयांवर विशेष सादरीकरणे होतील. या मध्ये संकरण, संघर्ष, कल्याण मानके आणि नीतिमत्ता, अश्व धोरण, घोड्यांची आयात-निर्यात, आणि पशुवैद्यकीय व औद्योगिक दृष्टिकोन या विषयांवर गुजरातच्या वनतारा येथील डॉ. रामनाथन, युके येथील सुश्री झारा पॉली, युके येथील श्री. रोली ओवर्स, पुणे येथील स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. नमेश किल्लेमशेट्टी, पुणे येथील प्रसिद्ध भारतीय अश्वारोहण क्रीडापटू श्री. कपिलेश भाटे, नेतृत्व प्रशिक्षक, ब्लडस्टॉक विशेषज्ञ आणि लेखक श्री. गौरव रामपाल आणि बंगळूर येथील गॅलोपिन व्हेट क्लिनिकचे डॉ. हसनेन मिर्झा यांसारखे तज्ञ मार्गदर्शन करतील. रविवार, १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता परिषदेची सांगता होईल.
’द इक्वेस्ट्रियन फोरम’च्या निमंत्रक कु. गायत्री राहुल कराड म्हणाल्या, भारताचा अश्व-उद्योग सध्या विखुरलेला आणि मोठ्या प्रमाणावर अप्रयुक्त असल्याने, अधिक मजबूत संस्थात्मक चौकट तयार करणे, मानके सुधारणे आणि आर्थिक व क्रीडा क्षमतांना चालना देणे यावर संवाद सुरू करण्याचा या फोरमचा उद्देश आहे. हा फोरम अश्व-क्षेत्रातील उद्योगाचे औपचारिकीकरण, प्रशासन, व्यवसायाची शाश्वतता, संकरण पद्धती, पशुवैद्यकीय विज्ञान, पोषण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करेल.
मुख्य सत्रे, पॅनेल चर्चा आणि नेटवर्किंगच्या संधींच्या माध्यमातून, ’द इक्वेस्ट्रियन फोरम’ अर्थपूर्ण भागीदारींना चालना देण्याचे आणि भारतातील अधिक सुसंगत व भविष्यासाठी सज्ज अशा अश्व-परिसंस्थेसाठी पायाभरणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

