पुणे, दि. १०: ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम करुन त्यांना ‘महाराष्ट्राचा आर्थिक कणा’ करण्यावर भर आहे, ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे एक सशक्त माध्यम ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ सादरीकरण व अमंलबजावणी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, विभागाचे सहसचिव निवृत्तीनाथ मऱ्हाळे, पशुसंवर्धन विभागातील प्रादेशिक पशुसंवर्धन उपायुक्त तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उपस्थित होते.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पशुपालनाकडे केवळ पारंपारिक व्यवसाय म्हणून न पाहता एक व्यावसायिक उद्योजकता म्हणून पाहण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पशुजन्य उत्पादनांची उत्पादकता वाढवणे व स्थानिक स्तरावरच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार विकासाच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या या पुढाकारामुळे राज्याच्या ग्रामीण विकास प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. त्यामुळे योजनेत पात्र लाभार्थ्यांची निवड करावी, योजनेत गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ही योजना प्रभावीपणे राबवून यशस्वी करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत. योजनेचे जिल्हा, तालुकानिहाय शिबारांचे आयोजन करावे तसेच योजनांची अधिकाधिक जनजागृती करावी. कामाचा महिनानिहाय आढावा घेण्यात येईल. येत्या काळात लाभ वाटपाबाबत भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
मंत्री श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करुन शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण होत आहेत. पशुसंर्वधनाला उद्योजकाचा दर्जा दिला पाहिजे. ग्रामीण युवकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. येत्या काळात वराहपालन व्यवसायावर भर द्यावा, अंड्याचा ब्रॅंड निर्माण करण्याकरिता सामूहिक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करावे. पशुसंवर्धन क्षेत्रात एक जिल्हा एक उत्पादन या तत्वावर काम करावे असे सांगून, परळी वैजनाथ येथे येथील महापशुसंर्वधन एक्स्पोचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल श्रीमती मुंडे यांनी विभागाचे अभिनंदन केले.
डॉ. रामास्वामी एन.म्हणाले, महाराष्ट्र हे पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य आहे, त्यामुळे विभागाला कृषीचा दर्जा निर्माण करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘व्हिजन डाक्युमेंट’ विकास क्षेत्रात कृषी आणि पशुसंवर्धन समावेश करण्यात आलेला आहे. ‘व्हिजन डाक्युमेंट’च्या धर्तीवर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पशुपालन क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ राबविण्यात येत आहे.
अर्थसंकल्पात पशुसंर्वधन विभागाकरिता ४ हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड, लाभार्थ्यांशी संवाद, वेळेत निधी खर्च, किसान क्रेडिट कार्डचे वितरण, कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मनुष्यबळ उपलब्धता आदीबाबत नियोजन करुन काम करायचे आहे, असेही डॉ. रामास्वामी एन. म्हणाले.
डॉ. पाटील म्हणाले, पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करुन विभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यामध्ये जवळपास 27 नवीन योजनांची पुनर्रचना करण्यात आली आहे. ग्रामीण अर्थव्यव्यस्थेला चालना देण्यासोबत यामाध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे, असेही डॉ. पाटील म्हणाले.
याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे श्रीमती मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महा पशुधन वार्ता मासिकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ तयार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि परळी वैजनाथ येथे येथील महापशुसंर्वधन एक्स्पोचे यशस्वी आयोजन केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. पशुसंवर्धन आयुक्त पदावरून बुलढाणा जिल्हाधिकारीपदी बदली झालेले डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना पशुसंवर्धन विभागाच्यावतीने निरोप देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

