पुणे, दि. ९ एप्रिल : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेकडून वर्षभर विविध वैचारिक व सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी या विषयाचा प्रस्ताव दिला होता. महात्मा फुले यांनी पुणे शहरातूनच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाचा पाया घातला. तसेच विविध समाज घटकांसाठी शाळा, महिलांसाठी आश्रम, विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, तसेच स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली.
महात्मा फुले हे सन १८७६ मध्ये पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. त्यांच्या या कार्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हे विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर महापुरुषांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या सर्वांच्या विचारांचा जागर आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध व्याख्याने, प्रदर्शन, शैक्षणिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या निर्णयामुळे पुण्यात सामाजिक प्रबोधनाची चळवळ वाढीस लागण्यास मदत होईल, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.
पुणे शहराच्या सर्व सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास स्थायी समितीची मान्यता: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीवर शहराची ओळख अधिक ठळक करण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्पात काही समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार जाहीर केले होते. आज स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे शहराच्या प्रमुख सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहरात प्रवेश करताना पुण्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आधुनिक ओळख अधोरेखित करण्यासाठी आकर्षक व सुबक प्रवेशद्वार उभारले जाणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.स्थायी समितीच्या या निर्णयामुळे पुण्याच्या सर्व प्रमुख सीमांवर टप्प्याटप्प्याने प्रवेशद्वार उभारले जाणार असून, शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे.

