पुणे- एकीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पुणेकरांच्या डोक्यावरील बेकायदा केबल चे जाळे हटविण्याच्या मोहिमेला सुरुवात केली असताना काहीजण तिला अडथळा आणीत असल्याचा आरोप काही माध्यमांतून होऊ लागलेला आहे तर दुसरीकडे बेकायदा केबल मुळे निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना टिळक रस्त्यावर गेल्या वर्षी अपघात झाल्याच्या प्रकरणात आत्ता कुठे महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र ठेवले गेले आहे . हे दोषारोप पत्र टिळकरोड क्षेत्रीय अधिकाऱ्यां विरूध्द न्यायालयात दाखल झाले आहे.
हा अपघात टिळक रस्त्यावर अचानक तुटून पडलेल्या केबल मुळे झाला त्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले आणि त्यांच्या हाताची अनामिका त्यांना गमवावी लागली . त्याच वेळी त्यांनी महापालिकेच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता ,त्याबाबतचे दोषारोप पत्र आता न्यायालयात दाखल झाले आहे. महानगरपालिकेच्या कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित तत्कालीन पेठ निरीक्षक दोघा कर्मचाऱ्यांना ते त्या अपघातास कारणीभूत असल्याच्या आरोपामुळे आता फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास निवृत्त सहायक पोलिस आयुक्त अरविंद पाटील बुलेट मोटरसायकलने स्वारगेटच्या दिशेने निघाले असताना हिराबाग चौकातून पुढे जाताच अचानक उजव्या बाजूने गुलमोहरच्या फांदीवरून लोंबकळणारी धातूची पिळदार केबलची एक गुंडाळी हेलकावत रस्त्यावर आली आणि बुलेटच्या पुढील चाकात अडकली. त्यामुळे ते मोटर सायकल सह वर उचलले गेले व बुलेटच्या वजनामुळे ती फांदी तुटल्याने बुलेटसह जोरात रस्त्यावर आदळले. सदर अपघातात त्यांच्या उजव्या हाताची अनामिका केबलने कापली गेली व हातापायास मुका मार लागला. त्यांचेवर सातारा रस्त्यावरील राव नर्सिंग होम येथे उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे सदर अपघात जवळच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या सिसिटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातातून श्री. पाटील केवळ नशिबाने वाचले असले तरी त्यांच्या उजव्या हाताचे बोट मात्र कायमचे अधू झाले आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेली धातूची पीळदार केबल इंटरनेटच्या केबलला ताण देण्यासाठी वापरली जाते. दुर्दैवाने हिराबाग चौकात झाडांवर अजूनही अनेक केबल्स लटकत असल्याचे दिसून येत आहे. ती केबल सुद्धा अपघात होण्यापूर्वी बरेच दिवसांपासून तेथे लटकत होती असे स्थानिक नगरिकांचे म्हणणे आहे. वास्तविक अशा धोकादायक रीतीने लटकणाऱ्या केबल्समुळे शहरात अनेक लहान मोठे अपघात नित्य घडत असून त्यास केवळ महानगरपालिकेचा निष्क्रियपणा व असंवेदनशीलता कारणीभूत असल्यामुळेच श्री. पाटील यांनी आग्रहपूर्वक पोलिसांकडे दखलपात्र गुन्हा नोंदविला होता.
अरविंद पाटील यांच्या तक्रारी प्रमाणे स्वारगेट पोलिस ठाण्यात गु. र. न. १०१/२०२५ हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ),२८५,३(५) अन्वये, बेकायदेशीर व धोकादायक रीतीने केबल झाडावर लावणारा अज्ञात व्यक्ति आणि ती अनधिकृत केबल हटविण्याची जबाबदारी असलेले महानगरपालिकेचे संबंधीत अधिकारी यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आला होता. यथावकाश त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी नुकतेच सदर प्रकरणी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. दरम्यान या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरच आता संपूर्ण पुणे शहरातील अनधिकृत व धोकादायक रीत्या लटकणाऱ्या केबल्स हटविण्याकरिता पुणे महानगरपालिकेने जोरदार मोहीम उघडली असल्यामुळे लवकरच अशा ओंगळवाण्या व धोकादायक असलेल्या केबल्स पुण्यातून हद्दपार होतील असे दिलासादायक चित्र नक्कीच निर्माण झाले आहे.

