भाजप आता खरोखर FIR अगदी योग्य पद्धतीनं दाखल करणार की काँग्रेसच्या विरोधात बारामतीत लढणार
पुणे: काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनीच स्वतः हे जाहीर केलं होतं की, राज्यातील महायुती सरकारनं जर अजित पवारांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ. पण ही घोषणा उमेदवाराच्या वैयक्तिक पातळीवरील घोषणा असल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता आता तासाभरापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवरुन उमेदवार आकाश मोरे यांचं विधानच शेअर केलं आहे. खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच शेअर केल्यानं ही काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आता भाजप्रणित महायुतीसमोर मोठा पेचप्रसंग असणार आहे. कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सातत्यानं अजित पवारांच्या अपघातप्रकरणावर अनेक गोष्टी कशा संशयास्पद आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडं शासनाकडून हा निव्वळ अपघात असल्याचं म्हटलं असून त्याच्या चौकशीचे आदेशही दिले होते. चौकशी अहवालही शासनाला सादर झाला पण अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. रोहित पवारांनी सातत्यानं विमान कंपनी व्हीएसआरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.व्हीएसआर कंपनीचा मालक आणि भाजपच्या नेत्यांचे व्यावसायिक संबंध असल्यानेच सरकार ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळंच आता काँग्रेसनं बारामतीत उमेदवारी अर्ज भरुन भाजपला गुन्हा दाखल करण्यासाठी कोंडीत पकडल्याची चर्चा आहे. पण आता काँग्रेसच्या या मागणीनंतर फडणवीसांचं महायुतीसरकार काय निर्णय घेतय? हे पाहावं लागणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळं ही निवडणूक बिनविरोध होऊ न दिल्यानं अनेकांनी काँग्रेसवर टीकाही केली आहे.पण काँग्रेसच्या या खेळीनं भाजपला चेकमेट केल्याची आता चर्चा होत आहे. कारण ज्या अजित पवारांच्या नावावरुन राजकारण सुरु आहे, त्याच अजित पवारांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास उमेदवारी मागे घेण्याची अट काँग्रेसनं टाकली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

