अहिल्यानगर- भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीतर्फे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची अचानक भेट घेतल्याने, राहुरीची ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला.
राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राजक्त तनपुरे यांचे फोनवरून बोलणे करून दिल्याचे समजते. आगामी काळात प्राजक्त तनपुरे राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे समजते. या नाट्यमय घडामोडींमुळे तनपुरे आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .
या चर्चेच्या नंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचे म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया पाहता ते या निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल, तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.
पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, एमआयडीसी निर्माण होणे गरजेचे आहे. येथील धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातील समस्या कळकळीने मांडल्या. आम्ही यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. आम्ही सर्वजण प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहोत. ते जे म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल. प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या भागातील वलयाची आम्हाला कल्पना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उमेदवारी मागे घ्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोडला असल्याचे चव्हाण म्हणाले.

