पुणे-सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अजित पवारांच्या आठवणीने चांगल्याच भावूक झाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या.
. सुनेत्रा पवार म्हणाल्या, अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावले. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटले नव्हते की, बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा आपल्यात नाहीत असे मला अजूनही वाटत नाही. मला ते मान्यही नाही. पण नियतीने हा काळ माझ्यावर व तुमच्यावर आणला आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी व माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हाणी नाही, तर बारामती, महाराष्ट्र व देशाचीही हाणी झाली आहे.
दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ताच नव्हे तर प्रत्येक नागरीक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच त्यंचा विश्वास व आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जिव इमारती, ती न बोलणारी पाणे आणि फुले सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत, असे सुनेत्रा पवार रडत म्हणाल्या
मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले
सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे पाहूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षांत तुम्ही सर्वांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत होते. त्यामुळेच दादांनी प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडित काढले.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असे ते म्हणायचे. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला मिळालेली संधी आहे. शरद पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. त्यावर दादांनी आपल्या कष्टाने रंग भरले, कोंदण भरले, या बारामतीला फुलवले, जगवले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होणार नाही याचे मी वचन देते. बारामती जगातील सर्वात विकसित व प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते, तर त्यांची जिद्द होती. एक ध्यास होता.
दादांना बारामती एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेले. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, तर तो एक विचार होता. एक व्यवस्था होते. लोककल्याणकारी, लोककल्याणाची एक तळमळ होते. जोपर्यंत जिवातजीव आहे, तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहील, हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य सर्वांना ठावूक आहे. त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मी केला आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार अजित पवारांची आठवण काढताना पुढे म्हणाल्या, अजितदादा शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हे ही वचन देते की, माझ्यासाठी पार्थ व जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहील. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढेही तसाच सुरू राहील. लोकांची कामे होणे ही दादांना श्रद्धांजली आहे.
त्यांच्या जाण्याने बारामतीत अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण होते. आजही तशाच भावना आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला आदी सर्वजण हवालदिल झाले होते. पण आज मी ठामपणे सांगते की, बारामतीचा विकास हा पूर्वीसारखाच वेगाने सुरू राहील, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

